भाजप आणि शिवसेनेसोबत युती होणार का?; राज ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर

| Updated on: Jul 26, 2023 | 12:21 PM

अमित ठाकरे राजकारणात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप होणारच. अशा गोष्टी या ठरलेल्याच असतात, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले असता ते मीडियाशी संवाद साधत होते.

भाजप आणि शिवसेनेसोबत युती होणार का?; राज ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 26 जुलै 2023 : ठाकरे गट किंवा भाजपसोबत मनसेची युती होणार का? अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. मनसे, भाजप आणि ठाकरे गटाच्या मधल्या काळात गाठीभेटी झाल्या. त्यामुळे या चर्चांना अधिक जोर आला आहे. त्याबाबत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच विचारण्यात आलं असता राज यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. कुणी कुणाला भेटलं म्हणून लगेच युती होत नसते, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मागे एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. तेव्हा शरद पवार आले होते. त्यामुळे लगेच युती झाली का? युती हा तुमच्या बुलेटीनचा भाग असेल. त्याचा आमच्याशी काही संबंध नसतो, असंही राज यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुणे शहरातील शाखाध्यक्षांच्या कामांचा यावेळी त्यांनी आढवा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टोलच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. अमित ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. तो टोल फोडत चालला नाही. एखाद्या नाक्यावर हा प्रसंग घडला असेल. गाडीला फास्टॅग असूनही त्याला थांबवलं. टोल भरल्याचंही त्याने सांगितलं. संबंधित माणसाचा व्हॉकीटॉकी सुरू होता. तो उद्धटपणे बोलत होता. त्यावर पुढची रिअॅक्शन आली, असं राज ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

टोलमुक्तीचं काय झालं?

भाजपने यावर बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू हे भाजपने निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं त्याचं काय झालं ते भाजपने सांगावं ना. प्रत्येक वेळेला म्हैस्कर नावाच्या माणसाला टोलची कंत्राटं मिळतात तो कुणाचा लाडका आहे? टोलची प्रकरणं तरी काय आहेत?, असा सवाल त्यांनी केला. समृद्धी महामार्गावर झालेली घटना तुम्हाला माहीतच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूला फेन्सिंग टाकलं गेलं. तसं समृद्धी महामार्गावर टाकलं नाही. त्यामुळे आतापर्यंत अपघातात 400 लोकं मृत्यूमुखी पडले. त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी केला.

सरकार जबाबदारी घेणार का?

अख्खा समृद्धी महामार्ग फेन्सिंग न लावता मोकळा केला. त्यावर कुत्रे, गायी, हरणं येत आहेत. ज्या स्पीडला लोकं जाणार गाड्या घेऊन, ट्रक घेऊन, तर अपघातात मरणार. ही सरकारची जबाबदारी नाही का? सरकारने प्रिकॉशन्स घ्यायला नको होती का? त्या आधी टोल बसवता. लोकांच्या जगण्यामरण्याचं काही घेणंदेणं नाही. रस्ता बनवला तर टोल पाहिजे यांना, असा हल्ला त्यांनी चढवला.

रस्त्याची अवस्था घाणेरडी

रस्त्याची अवस्था घाणेरडी आहे. मुंबई-पुण्याचा टोल बंद होता. या महामार्गावरून येण्यासाठी सहा सहा तास लागतात. सर्व ठिकाणी खड्डे पडलेत. तुम्ही कसले आमच्याकडून टोल वसूल करता? मनमानी सुरू आहे. त्यावर भाजप किंवा सरकार काही बोलणार का? हा प्रश्न तुमचा आहे. या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे. पालकमंत्र्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.आम्ही 65 टोल नाके बंद केले. त्याचं कौतुक करणार नाही. जे लोक टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून कॅम्पेन करत होते. त्यांना तुम्ही विचारत नाही, असा प्रश्नच त्यांनी मीडियाला केला.