“राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”, रामदास आठवले यांची मागणी, म्हणाले “त्यांना देशाबद्दल…”

| Updated on: Sep 17, 2024 | 5:55 PM

बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करु नये, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा, रामदास आठवले यांची मागणी, म्हणाले त्यांना देशाबद्दल...
Follow us on

Minister Ramdas Athawale On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मुद्द्यावरुन राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल, मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. त्यांनी बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करु नये, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

“राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा”

“राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बाहेरच्या देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करु नये. हे राहुल गांधींना शोभत नाही. त्यामुळे राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा”, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

अजित पवारांमुळे महायुतीच कोणतही नुकसान नाही . लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा आहे. पण राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. मी असल्यामुळे महायुतीने राज ठाकरेंना घेऊ नये, असेही वक्तव्य रामदास आठवले यांनी केले.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना देशातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारले. यावेळी राहुल गांधींनी एक वक्तव्य केले. प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे. मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची ही वेळ नव्हे. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल, असे विधान राहुल गांधींनी केले होते.

आपण आर्थिक बाबींवर नजर टाकली तर 100 रुपयांपैकी आदिवासींना केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 5 रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाट्याला येते. त्यांचा देशातील वाटा कमी आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांची यादी काढा. मला त्यात अग्रभागी दलित, आदिवासींचे नाव दाखवा, ते दिसणार नाहीत. मला वाटते देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50 टक्के आहेत. पण आम्ही आजारपणावर इलाज करत नाही. आरक्षण एकमात्र साधन नाही. इतर पण साधन आहेत, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.