एनडीएत या, केंद्रीय मंत्री करतो, प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर; कुणी दिली ऑफर?

| Updated on: Sep 22, 2024 | 12:30 PM

रिपब्लिकन पक्षाला विधानसभेत 10 ते 12 जागा मिळायला हव्यात. माझ्या पक्षाची मोठी ताकद आहे. नागालँडमध्ये माझा पक्ष आहे. मणिपूरमध्ये आहे. लोकसभेत आमच्या दोन जागा निवडून आल्या असत्या. पण आम्हाला जागा दिल्या गेल्या नाहीत. विधानसभेत आम्हाला जागा द्याव्यात. विदर्भात तीन ते चार जागा दिल्या पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

एनडीएत या, केंद्रीय मंत्री करतो, प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर; कुणी दिली ऑफर?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे. तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्री करतो. तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो. वेळ आल्यास माझं मंत्रिपदही तुम्हाला देईन. फक्त तुम्ही आमच्यासोबत या, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली. आठवले यांची ही ऑफर आंबेडकर स्वीकारतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रामदास आठवले आज नागपुरात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही ऑफर दिली.

एवढ्या निवडणुका लढवूनही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. त्यांचे उमेदवार निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी आता एनडीएत यावे. त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी मदत करेल. नाही तर माझं मंत्रिपदही मी त्यांना द्यायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर ते आतापर्यंत उपमुख्यमंत्री बनू शकले असते, असं रामदास आठवले म्हणाले.

सत्ता येत नाही

आम्ही दोघे एकत्र असतो तर त्याचा मोठा फायदा झाला असता. त्यांनी माझ्यासोबत यायला पाहिजे. त्यामुळे बहुजन एकत्रित येतील. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावं. त्यांनी सोबत यायला पाहिजे. एकटे राहून सत्तेत येता येत नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

त्यांच्याशिवाय ऐक्य अशक्य

रिपब्लिकन पक्षाचं एकीकरण करण्यासाठी सगळ्या गटांनी एकत्रित येण्याची गरज आहे. फक्त एकट्याने किंवा दोघांनी येऊन चालणार नाही. प्रकाश आंबेडकर जर पुढाकार घेत असतील तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार नाही. माझी पॉझिटिव्ह भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकीकृत रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं. माझा त्यांना पाठिंबा राहील. काहीही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्यच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तो फॉर्म्युला स्वीकारला नाही

उद्धव ठाकरे युतीमध्ये असताना त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या. मात्र त्यावेळी 3-2चा फॉर्म्युला स्वीकारावा असं मी म्हटलं होतं. मात्र त्यावेळी दोघांनी सुद्धा तो फॉर्म्युला स्वीकारला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याला पसंती दिली, असंही ते म्हणाले.

सरकार पडणार नाही

तिसऱ्यांदा मला राज्यमंत्री बनविण्यात आलं. यात माझ्या कार्यकर्त्यांचे आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. मला विदर्भ आणि नागपूरने मोठी साथ दिली आहे. मी ज्या सरकारमध्ये आहे ते 5 वर्ष चालणारं सरकार आहे. हे सरकार पडेल असे सांगितले जात आहे. मात्र सरकार पडण्याचा प्रश्न येत नाही. नितीश कुमार आणि चंद्राबाबू आमच्यासोबत आहेत. आमच्या सरकारला बहुमत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मग संविधान कसं बदलणार?

आम्हाला लोकसभेत कमी जागा मिळाल्या. विदर्भ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र तरीही जागा कमी मिळाल्या. मराठवाड्यातही कमी जागा मिळाल्या. कारण संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्याचा परिणाम झाला. मोदींनी अनेक आंबेडकर सेंटर बनवली. लंडनमधील बाबासाहेब आंबेडकर यांचं घर गेतलं. इंदू मिलमधील स्मारक बनवण्यात येणार आहे. हे सर्व मोदींच्या काळात झालं आहे. मग ते संविधान कसं बदलतील? असा सवाल त्यांनी केला.