महाराष्ट्रातील नवे ‘संत’ महामंडळ! नैतिकता आहे कुठे?; सामनातून युती सरकारला सवाल

| Updated on: Jul 08, 2023 | 7:29 AM

Saamana Editorial on Shivsena BJP NCP Alliance : 'हे' सगळे कलियुगातील 'संत', त्यांच्या पायाचे तीर्थ सध्या भाजप प्राशन करतंय,महाराष्ट्रासाठी ते विषच!; सामनातून नव्या युतीवर घणाघात

महाराष्ट्रातील नवे संत महामंडळ! नैतिकता आहे कुठे?; सामनातून युती सरकारला सवाल
Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी बंड केलं अन् ते युती सरकारमध्ये सामील झाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीत फुट पडली आहे. अशात त्यांच्या या कृतीवर महाविकास आघाडीचे नेते नाराज आहेत. सामनाच्या आजच्या अग्रलेखातूनही त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. तसंच भाजपवर देखील हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा…

आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे? व खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? एकंदरीत सगळाच घोटाळा आहे.

भाजपचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा ‘मनी लाँडरिंग’ घोटाळा करून ठेवला. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्यात 178 कोटींचा घोटाळा केला, पण संत, महात्मे व युगपुरुषांच्या चुका शोधायच्या नसतात. त्यांचे गुन्हे म्हणजे प्रसादच असतो. महाराष्ट्राला सध्या तो प्रसाद मिळाला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेच, पण हे सगळे कलियुगातील ‘संत’ आहेत. त्यांच्या पायाचे तीर्थ सध्या भाजप प्राशन करीत आहे. महाराष्ट्रासाठी ते विष आहे!

अजित पवार व त्यांचे ‘संत’ महामंडळ भारतीय जनता पक्षाच्या चरणी लीन झाले. विरोधी पक्षनेत्यानेच अशा प्रकारे राजकीय शीर्षासन करावे हे संसदीय लोकशाहीवरील विश्वास उडविणारे प्रकरण आहे. सत्तेचा पिसारा फुलवून आज हे मोर भाजपच्या अंगणात नाचत-बागडत आहेत, पण भाजपच्या अंगणात नाचणाऱ्यांचा नंतर थांग लागत नाही, हा इतिहास आहे.

अजित पवार व त्यांचे महामंडळ चौकश्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपचरणी गेले. अन्याय, नैतिकता, मोदीप्रेम वगैरे सगळे झूठ आहे. अर्थात अजित पवार त्यांच्या या कृतीमुळे ‘दादा’ राहिले नाहीत.

शिखर बँकेने कारखान्याला वेळोवेळी कर्ज दिले. 80 कोटींची थकबाकी असताना या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. या सर्व व्यवहारात 826 कोटींची खिरापत अजित पवारांच्या निकटवर्तीयांना वाटण्यात आली.

कवडीमोल दराने कारखाना मिळाला व पुणे जिल्हा बँकेकडून पुन्हा 826 कोटींचे कर्ज घेतले. त्यावेळी बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते. हा पैसा साखर कारखान्याच्या कामासाठीच वापरायला हवा होता, पण ‘ईडी’च्या आरोपपत्रानुसार तसे दिसत नाही.

पैसा अन्यत्र वळवला व यातील पैसा मोठय़ा प्रमाणात परदेशात पाठवला. म्हणजे हे सरळ सरळ ‘मनी लाँडरिंग’ आहे व घोटाळय़ाचे स्वरूप गंभीर आहे, सार्वजनिक पैशांची सरळ सरळ अफरातफर आहे. असा आमचा आरोप नसून भाजपच्या ‘प्रिय’ ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील पुरावे आहेत.

दुसरा एखादा कोणी या प्रकरणात असता तर श्री. फडणवीस यांच्या शब्दात तो ‘चक्की पिसिंग’ला गेला असता, पण आता अजित पवार, मुश्रीफ, भुजबळ, वळसे हे ‘चक्की पिसिंग’चे महात्मे शुद्ध होऊन ‘पवित्र’ भिंतीवर बसले व उडत राजभवनावर गेले. तेथे ‘रेडे’ कापून मंत्र म्हणणाऱ्यांच्या पंगतीला बसले. म्हणजे रेड्यांचे महत्त्व येथे देखील आहे.

आता आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील हे सर्व आरोप खोटे की खरे? व खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? न्या. देशपांडे यांनी ‘ईडी’चे आरोपपत्र काय सांगते त्यावर बोट ठेवले.