शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही मी लाडका; संजय राऊत यांचं रोखठोक विधान

| Updated on: Mar 01, 2024 | 3:38 PM

महाराष्ट्रात अमित शाह आणि फडणवीस यांनी जो प्रयोग केला तो फसला आहे. शिंदेंना शिवसेना दिली. त्यांच्याकडे अर्धा टक्केही मतदान नाही. अजित पवारांकडे एक टक्काही मते नाही. हिंमत असेल तर त्यांनी ठाण्यात महापालिकेची निवडणूक घ्यावी. महाराष्ट्राच्या स्वाभीमानावर घाला घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे जुनं स्वप्न होते गुजरात्याचं हे स्वप्न होते. पण सत्ता कायम राहत नाही. आज आहे उद्या नाही. तेव्हा काय करणार? असाही सवाल राऊत यांनी केला.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही मी लाडका; संजय राऊत यांचं रोखठोक विधान
sanjay raut
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. आता केव्हाही लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होतील अशा परिस्थितीत टीव्ही 9 मराठीने आयोजित केलेल्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत दिली. त्यांनी उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपात जातील का ? या प्रश्नावर राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं असे म्हटले जात असले तरी उद्धव साहेब लोकभावनेचा आदर करणारे आहेत. आता लोकभावना त्यांच्या पाठीशी असल्याने आणि ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्यांच्या सोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाही असे म्हटले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी आपण दोघांचेही लाडके असल्याचे बिनधास्तपणे सांगितले.

भाजपाने आता लोकसभेच्या राज्यात शंभर जागा जिंकू दावा करायलाही हरकत नाही. तर देशात चारशे पार कशाला 500 ते 600 जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला पाहीजे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अशोक चव्हाण ताठ कण्याचे आहेत असे म्हटले जात होते. कारण ते जाणार हे माहीत होते. अजितदादांबद्दलही ताठ कण्याचे म्हणावे लागेल. कारण अजितदादांना जाण्याचा नाद आहे. ते सकाळीही जातात, दुपारीही जातात अशा नादी छंदी लोकांची का चर्चा करता. सोडून द्या असेही ते म्हणाले. जो माणूस घाबरलेला आहे. ज्याचे पाय लटपटतात. जो माणूस हिंमतीने उभं राहू शकत नाही. त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार. कुणीही असेल. अजितदादा असं नाही. आमच्या पक्षातही होते असे लोक होते असेही राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर…

उद्धव ठाकरे हे भाजपासोबत गेले तर अशा प्रश्नावर ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे लोकभावनेचा आदर करणारे आहे. राज्याची लोकभावना शिवसेनेच्या पाठीशी आहे. आघात झाले तरी हा माणूस लढतोय असे लोक म्हणतात. ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्यांच्यासोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाही असे संजय राऊत यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मी जास्त ओळखतो. असे झाले तर लोकांचा आमच्यावरचा विश्वास उडेल. राजकारणावरचा विश्वास उडेल. आम्ही म्हणजे नितीश कुमार नाही असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

आम्ही एलिझाबेथ टेलर नाही

आणि भाजपा सोबत का जावे? असं काय भाजपमध्ये आहे. काय ठेवलेय. राजकारणात काहीही होऊ शकते हे जरी खरं आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवू असं वाटलं होतं का? ही वेळ भाजपाने आणली. मग आम्ही भाजपसोबत का जावे. शिवसेनेचे उत्तम चालले आहे. चार माणसांशी लग्न करायला आम्ही काही एलिझाबेथ टेलर नाही. एलिझाबेथ टेलरने चार लग्नं केली होती असेही संजय राऊत मिश्किलपणे म्हणाले.

दिल्लीचे राजकारणी व्यापारी आहेत

हा देश ईदी अमीनच्या पद्धतीने चालणार नाही. राज्य घटनेनुसारच हा देश चालेल. महाराष्ट्रात 100 जागा जिंकू असा नारा दिला पाहिजे. देशात 500 ते 600 जागा जिंकण्याचा नारा दिला पाहिजे. तुम्ही 400 पार हा आकडा कसा ठरवता?. तुम्ही घोटाळेबाज आहात याचा अर्थ. चंदीगडमध्ये तेच केले. दिल्लीतील राज्यकर्ते हे व्यापारी आहेत. ते राजकारणी नाहीत. लोकशाही स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना माहीत नाही. त्यांना फक्त प्रॉफीट आणि लॉस माहीत आहे अशी टीका त्यांनी केली.  तुम्ही शरद पवार यांचे लाडके की उद्धव ठाकरे यांचे या प्रश्नावर त्यांनी नशीब मी मोदींचा लाडका नाही म्हणालात त्याचा आनंद आहे. मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचा लाडका आहे. देशानं ज्यांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं तर बिघडलं कुठे असा उलटप्रश्न त्यांनी यावेळी केला.