“आमचे गृहमंत्री आणि पंतप्रधान देश वाऱ्यावर सोडून प्रचारासाठी…”, संजय राऊतांचा घणाघात

| Updated on: Oct 03, 2024 | 10:55 AM

आम्हाला भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचार, आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

आमचे गृहमंत्री आणि पंतप्रधान देश वाऱ्यावर सोडून प्रचारासाठी..., संजय राऊतांचा घणाघात
Follow us on

Sanjay Raut On Modi-Shah Maharashtra Visit : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनिती आखल्या जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. आता येत्या 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला. आमचे गृहमंत्री आणि पंतप्रधान हे देश वाऱ्यावर सोडून प्रचार करण्यासाठी गल्लीबोळे फिरतात. देशाचा पंतप्रधान किंवा गृहमंत्री असा कधी पाहिलात का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

“देशाचा पंतप्रधान किंवा गृहमंत्री असा कधी पाहिलात का?”

आम्हाला भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचार, आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे. आम्हाला दिल्लीतून कोणीही यावं लागणार नाही. जसं आता देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान हे महाराष्ट्रात येऊन बसले आहे. पंतप्रधान मोदी मेट्रोच्या उद्घाटनाच्या नावाखाली येतात. आज ठाण्यात येतात, उद्या घोडबंदर, कोपरीत जातील, परवा पाचपाखाडीत जातील. मग वाघबीळ, मग नौपाड्याला जातील. पंतप्रधान आहेत ते, पंतप्रधानाने पंतप्रधानाप्रमाणे राहायला आणि वागायला हवं. मग आमच्याकडे भांडुपला येतील. तिथून कांजूरला जातील. देशाचा पंतप्रधान असा प्रचार कधी करतो का? देशाचा पंतप्रधान किंवा गृहमंत्री असा कधी पाहिलात का? सरदार पटेल जागावाटपासाठी मुंबईत, महाराष्ट्र किंवा गुजरात येऊन बसायचे का? अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

“प्रचार करण्यासाठी गल्लीबोळे फिरत आहेत”

सरदार वल्लभ भाई पटेल यांना सरदार यासाठी म्हणतात की त्यांनी देशाचा विचार केला. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला. ते त्यांच्या पक्षाचा वॉर्डवॉर्डात जाऊन निवडणुकीचा प्रचार करत नव्हते. ते एकच प्रचारसभा घ्यायचे आणि ते पुरेसे असायचे. आमचे गृहमंत्री आणि पंतप्रधान हे देश वाऱ्यावर सोडून प्रचार करण्यासाठी गल्लीबोळे फिरत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

वन नेशन वन इलेक्शन तुम्हाला झेपणार आहे का? गृहमंत्री किती दिवसांपासून महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान मेट्रोचे सहावेळा उद्धाटन करतात. येत्या ५ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी ठाण्यात येतात, म्हणून घोडबंदर रोडवरील ट्राफिकच बंद करुन टाकलं आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.