“…म्हणून मी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं”, शिंदे गटाच्या आमदार काय म्हणाल्या?

| Updated on: Sep 13, 2024 | 12:57 PM

गेल्या अनेक वर्षांपासून मी मुस्लिम धर्मासाठी काम करत आहे. कोरोना काळ सुरु असतानाही आम्ही मुस्लिम धर्मासाठी इफ्तारी पोहोचवली होती. त्यावेळी आमच्यावर टीका का झाली नाही. कारण त्यावेळी आम्ही तिकडे होतो म्हणून का? असा सवालही यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.

“…म्हणून मी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं”, शिंदे गटाच्या आमदार काय म्हणाल्या?
Follow us on

 Yamini Jadhav On Burqas Distribution : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सध्या सर्वच पक्ष हे मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. त्यातच सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून आपपल्या विभागातील मतदारांसाठी विविध युक्तीही लढवताना दिसत आहेत. मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी नुकतंच मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरुन आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. आता यावर यामिनी जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी बुरखा वाटप केले, तर मग त्यात इतकं वावगं वाटण्यासारखं काय आहे?” असा सवाल यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.

यामिनी जाधव यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी Exclusive चर्चा केली. यावेळी त्यांनी बुरखा वाटप कार्यक्रमामुळे झालेल्या टीकेवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी “मी गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम धर्मासाठी काम करत आहे. मुस्लिम धर्मातील महिलांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर तो बुरखा. हा त्यांचा एक सन्मान आहे. त्या दृष्टीने मी हे वाटप केलेलं आहे”, असे यामिनी जाधव म्हणाल्या.

“ते करण्यामागे एक हेतू होता”

“माझ्या विधानसभेच्या मतदारसंघात सर्वधर्मीय लोक राहतात. या ठिकाणी सर्व धर्माची लोक राहतात. लोकप्रतिनिधीने त्याच्या विभागातील लोकांना काय हवं, ते कुठल्याही धर्माचे का असेना, त्यांचा पहिला विचार करणं गरजेचे असते. लोकप्रतिनिधीने बाहेर सतत वावरताना स्वत:चा धर्म सतत पुढे न करता, माझ्या लोकांना काय हवं हे पाहणं गरजेचे असते. या विभागाचे नेतृत्व गेल्या २५ ते ३० वर्षांपासून यशवंत जाधव करत आहेत. या ठिकाणी ते काम करत आहे. दिवाळीच्या वेळी आपण घराघरात एखादी भेटवस्तू देत असतो. पण मुस्लिम भगिनींना आपण काहीही देत नाही, हा ते करण्यामागे एक हेतू होता”, असे यामिनी जाधव यांनी म्हटले.

“गेल्या वर्षभरापासून ही संकल्पना माझ्या डोक्यात आहे. वर्षभर आम्ही त्यावर काम केले. त्यासाठी आधारकार्ड आणि इतर तपासणी केली. त्यानंतर हा बुरखा वाटप कार्यक्रम केला. कारण मुस्लिम धर्मातील महिलांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर तो बुरखा. हा त्यांचा एक सन्मान आहे. त्या दृष्टीने मी हे वाटप केलेलं आहे. माझ्यावर टीका होत आहे की, लांगूनचालन आम्ही करत आहोत. पण गेल्या अनेक वर्षांपासून मी मुस्लिम धर्मासाठी काम करत आहे. कोरोना काळ सुरु असतानाही आम्ही मुस्लिम धर्मासाठी इफ्तारी पोहोचवली होती. त्यासोबत रोझा संपल्यानंतर ज्या व्यक्ती गरीब आहेत, ज्यांना शिरखुरमा बनवणं शक्य नाही, त्यांच्या घरी आम्ही दोन लीटर दूध आणि इतर जे काही साहित्य असतं ते दिलं होतं. त्यावेळी आमच्यावर टीका का झाली नाही. कारण त्यावेळी आम्ही तिकडे होतो म्हणून का?” असा सवालही यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.

“माझ्या हिंदुत्वाला कुठेही धक्का लागतोय”

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वत:च्या शिवसेनेत अनेक कार्यकर्ते हे मुस्लिम समाजाचे होते. मंत्री शाबिर शेखही मुस्लिम होते. मग त्यावेळी हिंदू धर्म कुठे भ्रष्ट झाला का? हिंदूत्व म्हणजे सर्वसमावेशक असून या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदू समजला जातो, मग तो कोणत्याही धर्माचा असू दे? माझ्या विभागात ख्रिश्चन, बुद्ध, तामिळ, तेलुगु या सर्व समाजाची लोक आहेत आणि या सर्व धर्माच्या प्रत्येक सणाला मी त्या त्या भागात आवर्जून जाते. याचा अर्थ माझ्या हिंदुत्वाला कुठेही धक्का लागतोय, असं नाही”, असेही यामिनी जाधव म्हणाल्या.

“मी स्व:त सांगते हो आम्ही मुस्लिम धर्मावरही प्रेम करतो. यशवंत जाधव यांनी जुलूस असतानाही काही योजनांची घोषणा केली होती, मग त्यावेळी कोणी का प्रश्न उपस्थित केला नाही. तेव्हा तुम्हाला मुस्लिम समाजाचे मतं महत्त्वाची वाटत होती का? आज आम्ही मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी बुरखा वाटप केले, तर मग त्यात इतकं वावगं वाटण्यासारखं काय आहे?” असाही प्रश्न यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.