Eknath Shinde vs Shiv Sena : राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा घमासान, थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला सुरुवात

| Updated on: Aug 04, 2022 | 10:45 AM

Eknath Shinde vs Shiv Sena : शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे.

Eknath Shinde vs Shiv Sena : राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा घमासान, थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला सुरुवात
राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा घमासान, थोड्याच वेळात कोर्टा सुनावणीला सुरुवात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. काल शिंदे गट आणि शिवसेनेच्या (shivsena) वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. राज्यपालांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि पक्षाचा अधिकार आदी मुद्द्यांवर काल सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद आणि प्रतिवाद करण्यात आला होता. त्यानंतर सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (harish salve) यांनी त्यांचं म्हणणं लेखी मांडण्यास सांगितलं होतं. साळवे यांनी कालच लेखी म्हणणं मांडणार असल्याचं सांगितल्यानंतर कोर्टाने आज ही सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि शिवसेनेच्या मिळून एकूण पाच याचिका दाखल आहेत. त्यावर ही सुनावणी होत आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात काल शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला होता. शिंदे गटाला पक्षाच्या बैठकीला बोलावलं होतं. त्यांना व्हीप जारी केला होता. पण ते आले नाही. शिंदे गटाचे आमदार आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर आमचा प्रतोद नियुक्त केल्याचं पत्र त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पाठवलं. शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलं आहे. त्यामुळे तेच ओरिजिनिल शिवसेना असल्याचा दावा करू शकत नाही. दहावी सूची त्याला परवानगी देत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

वाद फक्त नेतृत्वाचा आहे

सिब्बल यांचा हा युक्तिवाद शिंदे यांचे वकील हरीश साळवे यांनी खोडून काढला. शिवसेनेत कोणतीही फूट पडलेली नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. फक्त शिवसेनेच्या नेतृत्वावर वाद आहे. एका गटाने आपला नेता बदलला आहे. तो त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणात पक्षांतर बंदी कायदाच लागू होत नाही, असं हरीश साळवे म्हणाले. अनेक पक्षात बंड होत असतात. अंतर्गत कलह होत असतो. नेतृत्व बदललं जातं. त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, असा दावाही साळवे यांनी केला होता.

शिंदे सरकार बेकायदेशीरच

दरम्यान, शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे. न्यायालय बारकाईनं हे प्रकरण ऐकत आहे. या सुनावणीचा देशावर परिणाम होईल. काल न्यायमुर्तींना लेखी म्हणणं द्यावं असं सांगितलं होते. त्यामुळे शिंदे गटाचे वकील त्यांचं लेखी म्हणणं मांडणार आहे. परंतु एकंदरीत कालचा युक्तिवाद पाहता आम्हाला न्याय मिळेल, असं सुभाष देसाई म्हणाले.