भाजपचा कारभार नाही, नुसताच ‘भार’, कसे 400 पार करतात ते पाहतोच; उद्धव ठाकरे यांनी ललकारले

| Updated on: Mar 03, 2024 | 8:06 PM

सर्वांच्या मनात ईव्हीएमची काळजी वाटत आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ईव्हीएम घोटाळा करून बघाच. देशभर आक्रोश उसळेल असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

भाजपचा कारभार नाही, नुसताच भार, कसे 400 पार करतात ते पाहतोच; उद्धव ठाकरे यांनी ललकारले
uddhav thackeray
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 3 मार्च 2024 : भाजपाने देशाला जुमलेबाजी शिवाय काही  दिलेले नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. रोजगार नाही. जिथे जातो तिथे असंतोष आहे. मी लोकांमध्ये जातो. ग्रामीण भागात माझ्यासभेत शेतकरीच असतात. मी त्यांना विचारतो महाविकास आघाडीने जी कर्जमुक्ती केली ती मिळाली की नाही? त्यांना जाहीरपणे विचारतो. चॅनल समोर विचारतो परंतू सरकारी मदत मिळतच नाही. हे घटनाबाह्य सरकार आलं. त्यांची मदत पोहोचलेलीच नाही. कर्जमाफी जाऊ द्या परंतू कर्जाचा डोंगरच वाढत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी धारावी येथील सभेत केली आहे.

एकच प्रोडक्ट कितीवेळा लॉन्च करणार. किती वेळा घासलं तरी त्यातून काय बाहेर पडणार. मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही मोदीविरोधात एकत्र आलो नाहीत. आम्ही हुकूमशाही विरोधात आहोत. हुकूमशाहीला एकच पर्याय म्हणजे लोकशाही. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. निवडणुकीपुरती जात पात बाजूला ठेवा. देशाला वाचवा. देश टिकला तर आपण धर्म टिकवू शकतो. देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. डोळ्यासमोर देश ठेवा असं माझे आजोबा सांगायचे. आशीर्वाद द्यायला देव पाहिजे. पण हे देव डोळ्यासमोर ठेवताय आणि देश कुठे आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

हे कारभार नाही नुसताच भार आहेत…

मोदी तुम्ही मणिपूरला गेला नाहीत. पण लक्षद्वीपला जाऊन बुडून आला. द्वारकेत पाण्यात जाऊन आला. तुम्ही समुद्राच्या तळाला जाऊ शकता पण मणिपूरला जात नाही. कारभार नाही, हे नुसताच भार आहेत अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. केवळ रामनामाचा जप नको, रामराज्य आणा. मी लढाईला मैदानात उतरलो आहे. तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात. ही लढाई एकट्याची नाही. मला मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायचंय म्हणून नाही. ही भावी पिढ्यांची लढाई आहे. तुमच्या पिढ्या देशात राहणार आहेत. त्या लोकशाहीने राहणार की हुकूमशाहीने राहणार आहेत. हे ठरवणारी ही लढाई आहे. हुकूमशाहीचं थडगं शिवरायांचा महाराष्ट्र बांधल्या शिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.