अदानीला प्रश्न विचारला, चमचे का वाजत आहेत?; उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला

| Updated on: Dec 18, 2023 | 5:14 PM

काल दुर्घटना झाली. स्फोट झाला त्यात ९ जणांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहतो. विषय केवळ कंपनीपुरता नाही. तर नऊ जणांसाठी नाही. हँडग्रेनेड बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. त्याबाबत तरी आपल्याला बोलू दिलं. तो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन, अपघात होता की घातपात होता का हे समोर आलं पाहिजे. गेल्या काही दिवसात असे स्फोट झाले आहेत. याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल ही अपक्षा आहे.

अदानीला प्रश्न विचारला, चमचे का वाजत आहेत?; उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला
uddav and raj thackeray
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नागपूर | 18 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या अदानी विरोधातील मोर्चाची खिल्ली उडवली आहे. यांना आता मोर्चे काढायला सूचलं का? सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मी अदानीला प्रश्न विचारला. चमचे का वाजत आहेत? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच कृपया कोणीही अर्धवट माहिती घेऊन बोलू नये. माहिती घेऊनच बोलावं, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता काढला आहे. उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे.

मला आता कळायला लागलं अदानीचे चमचे कोण कोण आहेत. आम्ही प्रश्न अदानीला विचारला, चमचे काय वाजत आहेत? आंदोलन केल्यानंतर विषय काय हे विचारून बोलतात, त्यांनी अर्धवट माहितीवरून बोलू नये. अर्धवट माहितीवर विचारू नये. शालीचं वजन पेलतं की नाही ते पाहायला पाहिजे. अर्धवट माहितीवर विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही. विमानाला टोल लागत नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना झाडावर बसवू नये, अशी खोचक टीका करतानाच आम्ही धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरलो. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विकास हवा. आमचं सरकार असताना आम्ही द्विधा मनस्थितीत होतो. टेंडर काढावं की सरकारच्या माध्यमातून विकास करावा याची मनात चलबिचल होती. पण त्यापूर्वीच आमचं सरकार पाडलं. त्यासाठी तर आमचं सरकार पाडलं नाही ना? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सेटलमेंट कशी होणार?

उद्धव ठाकरे यांनी सुपारी घेऊन मोर्चा काढल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? भाजप असती तर सेटलमेंट झाली असती. त्यामुळे सेटलमेंटचा प्रश्नच येत नाही, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

चंद्रावरून लोकं आणली

ठाकरेंच्या मोर्चाला मुंबईतील लोक नव्हती, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्या मोर्चाला मुंबईतील लोकं नव्हती, धारावीतील लोकं नव्हती. मोदींनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे. ती सर्व माणसे चंद्रावरून आणली होती. पण प्रश्न धारावीचे होते. त्यांनीच चांद्रयान सुरू करून वाहतूक सुरू केली आहे. हे लोक मुंबई विकण्यासाठी अदानींची चमचागिरी करत आहेत. त्याची लाज वाटते, अशी टीका त्यांनी केली.

दुरान्वयेही संबंध

नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. पण अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एसआयटी लावा, हे लावा ते लावा सुरू झालं. तेव्हाच मनात पाल चुकचुकली. यांना हे अधिवेशन भरकटवायचं असल्याचं दिसून आलं. आरोप समोरून झाल्याने लगेच चौकशी लावता. दुरान्वयाने संबंध नसतानाही चौकशी लावतात. मग आम्ही जे काही पुरावे मांडतो त्याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं, असं त्यांनी बडगुजर प्रकरणावर बोलताना सांगितलं.

इक्बाल मिर्चीला सर्टिफिकेट देणार का?

त्या कुटुंबाचा दाऊदशी काही संबंध नाही असं उपमुख्यमंत्री म्हणाले. ठिक आहे. मग तसं सर्टिफिकेट इक्बाल मिर्चीला देणार आहात का? या अधिवेशनाची सुरुवात नवाब मलिकांवरील आरोपाने झाली. आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता. सत्तेपुढे किंवा देशापुढे त्यांना सत्ता महत्त्वाची वाटत नाही, असा उपमुख्यमंत्री लाभल्याचं पाहून ऊर भरून आला. बाजूला मुख्यमंत्री असूनही पत्र लिहून देतात आणि इशारा देतात हा केवढा मोठा देशभक्तीचा नमूना होता. आम्ही पत्र दिलं. इक्बाल मिर्चीचं काय? प्रफुल्ल पटेलाचं काय? मलिक स्वच्छ झाले कोणतं गोमूत्र शिंपडलं? पटेलांचं काय? तत्परतेने खुलासा केला हे पाहून धन्यता आहे, असा टोला त्यांनी लगावला.