महायुतीत आम्हीच मोठे भाऊ, शिंदे गटाच्या दोन नेत्यांचं मोठं विधान; भाजपला इशारा?

| Updated on: Jun 15, 2024 | 2:25 PM

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. शंभुराज देसाई त्यांचं उपोषण सोडायला गेले होते. जरांगे यांनी दोन महिन्याचा वेळ दिला आहे. सरकारने दहा पावलं टाकली आहेत. न्याय द्यायचं काम सरकार करत आहे. कुणबी प्रमाणपत्र आणि इतर योजना सरकार राबवत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे सर्व होत आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे.

महायुतीत आम्हीच मोठे भाऊ, शिंदे गटाच्या दोन नेत्यांचं मोठं विधान; भाजपला इशारा?
sanjay shirsat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मोठा भाऊ छोटा भाऊवरून महाविकास आघाडीतील वाद थांबलेला असतानाच आता या वादाने महायुतीत डोकं वर काढलं आहे. महायुतीतील शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभुराज देसाई यांनी आम्हीच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं विधान केलं आहे. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळे आम्हीच मोठा भाऊ आहे, असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील दोन्ही नेत्यांनी ही विधाने केल्याने महायुतीत जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे गटाकडून एक प्रकारे हा भाजपला इशारा असल्याचंही सांगितलं जात आहे.

संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. टक्केवारीवर राजकारण मांडलं जात नाही. ठाकरेंनी लढवलेल्या जागा 22 आहेत. शिवसेनेच्या लढवलेल्या जागा 15 आहेत. त्याच्याशी तुलना कशी करणार? त्या तुलनेत आमचा जो स्ट्राईक रेट आहे, तो 46 टक्क्यांवर आहे. म्हणून आमच्या जागा त्या तुलनेत जास्त आहे. महायुतीत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आम्हीच मोठा भाऊ आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले.

ते पालखीचे भोई

काँग्रेसची ताकद आणि निवडून आलेले खासदार या बेसवर त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलंय. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते. त्यांनी पालखी घेऊन पुढे जावी. 288 मतदारसंघ ते लढवतील. त्यांचा विजय होवो किंवा पराभव होवो, हे लोक पालखीचे भोईच आहेत, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राऊतांमुळे पक्षाची वाट लागेल

तुम्ही काय कमावलं आणि गमावलं? हे चित्र रोखलं नाही तर भविष्यात तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. म्हणून आताही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे काय नुकसान याचं चिंतन मनन केलं पाहिजे. संजय राऊत म्हणेल तसा पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय.

मैत्रीतील वाद की खरं भांडण?

अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दानवे आणि सत्तार यांची मैत्री चांगली आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद होतात. त्या गोष्टी सीरिअस घेण्याची गरज नाही. त्यांच्यातील भांडण हे मैत्रीतील आहे की खरंखुरं भांडण आहे, हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

नाराजीवर निर्णय घ्यावा

छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. भुजबळ कोणत्या गोष्टीवर नाराज आहेत हे अजित पवार यांनी पाहावं. त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. अनेक ज्येष्ठ लोकांना टाळलं जातं. अनेकांना न्याय मिळत नाही. मंत्रिमंडळ विस्तार वेगळा अन् भुजबळ यांची नाराजी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

देसाई ही तेच म्हणाले

शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनीही संजय शिरसाट यांची री ओढली आहे. महायुतीत आम्हीच मोठे भाऊ आहोत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.