35 वर्षांनंतर पीयूष गोयल यांना लोकसभेवर का पाठवले जात आहे? वाचा इनसाईड स्टोरी

| Updated on: Mar 14, 2024 | 5:58 PM

पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून उतरवून भाजपाने स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट केला आहे. पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी दिली ती जबाबदारी नेटाने पार पाडली आहे. त्यामुळे ते त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

35 वर्षांनंतर पीयूष गोयल यांना लोकसभेवर का पाठवले जात आहे? वाचा इनसाईड स्टोरी
PIYUSH GOYAL
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 14 मार्च 2024 : भाजपाची लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे, त्यात राज्यसभेच्या सदस्यांनाही लोकसभेचे तिकीट दिले आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत राजीव चंद्रशेखर यांना तिकीट दिले होते. आता दुसऱ्या यादीतही राज्य सभेतील सदस्य पीयुष गोयल यांची मुंबई उत्तर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पीयूष गोयल आपल्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदा थेट जनतेत जाऊन निवडणूक लढविणार आहेत. भाजपाने सध्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापले आहे. 1989 ते 2003 पर्यंत या जागेवर भाजपाचा कब्जा आहे. राम नाईक पाच वेळा उत्तर मुंबईतून खासदार झाले आहेत. साल 2004 मध्ये राम नाईक यांचा पराभव कॉंग्रेसने अभिनेता गोंविदा यांना उभारुन केला होता. तर 2009 मध्ये कॉंग्रेसच्या संजय निरुपम यांनी राम नाईक यांना हरविले होते. साल 2014 मध्ये भाजपाने पुन्हा ही जागा ताब्यात घेतली. गोपाळ शेट्टी लागोपाठ दोन वेळा उत्तर मुंबईतून खासदार झाले, आता येथील 17 लाख मतदार पीयूष गोयल यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.

पीयूष गोयल हे चार्टर्ड अकाऊंटेंट आणि इनवेस्टमेंट बॅंकर आहेत. त्यांना राजकारण वारसाने प्राप्त झाले आहे. त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल दोन दशके भाजपाचे कोषाध्यक्ष राहीले होते. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात वेदप्रकाश गोयल मंत्री होते. त्यांची आई चंद्रकांता गोयल या तीन वेळा आमदार राहील्या आहेत. पीयूष गोयल 90 च्या दशकात भाजपाशी जोडले गेले. 2010 रोजी त्यांना महाराष्ट्रात राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. भाजपाने त्यांना लागोपाठ तीन वेळा राज्यसभेत संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील नेते म्हणून गोयल ओळखले जातात. साल 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये ते कोळसामंत्री होते. नंतर 2017 मध्ये सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर ते रेल्वे मंत्री झाले. साल 2019 मध्ये मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री झाले.आता ते प्रथमच लोकसभेच्या रणधुमाळीत उतरणार आहेत.

लोकसभेतील नवरत्न

भाजपा आपल्या नवरत्नांना लोकसभेत आणण्याची रणनीती आखत आहे. अमित शाह, राजनाथ सिंह, निशिकांत दुबे यांच्यासोबत आता लोकसभेत सभागृहात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी गोयल यांची साथ मिळणार आहे. पीयूष गोयल यांचे सर्वपक्षात मित्र आहेत. राज्यसभेत अनेक विधेयके मंजूर करण्यात गोयल यांची शिष्टाई कामी आली आहे. राम विलास पासवान यांच्या निधनानंतर गोयल यांच्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यात कोरोना काळात 80 कोटी जनतेला मोफत रेशन धान्य ही योजना राबविण्यात त्यांचा मोठा हात होता. या योजनेमुळे भाजपाला अनेक राज्यात भरभरून यश मिळाले. ऊर्जा मंत्री असताना एलईडी बल्बची योजना देखील पीयूष यांच्या डोक्यातूनच आल्याचे म्हटले जाते.ज्याची चर्चा सर्व जगात झाली. साल 2010 नंतर पीयूष गोयल भाजपाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. त्यामुळे त्यांची निवड झाल्याचे म्हटले जात आहे.