Asia Cup 2024 : उपांत्य फेरीसाठीचे चार संघ ठरले, भारत पाकिस्तानचा सामना या दिवशी

| Updated on: Jul 24, 2024 | 9:58 PM

वुमन्स आशिया कप स्पर्धेचा गेल्या आठवड्यापासून सुरु असलेला थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. उपांत्य फेरीसाठी चार संघ ठरले आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघांचा समावेश आहे.

Asia Cup 2024 : उपांत्य फेरीसाठीचे चार संघ ठरले, भारत पाकिस्तानचा सामना या दिवशी
Image Credit source: PTI
Follow us on

वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघांनी धडक मारली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन संघांनी साखळी फेरीत एकही सामना गमवला नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ अ आणि ब गटात टॉपला राहिले. तर बांग्लादेश आणि पाकिस्तानने प्रत्येक एक सामना गमवल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांग्लादेश आणि श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना 26 जुलैला दुपारी 2 वाजता होणार आहे. तर श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 26 जुलैला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. आता या चार संघांपैकी कोणते दोन संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत आणि श्रीलंका हे दोन संघ अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आहे. मात्र क्रिकेट अनिश्चितेतचा खेळ आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही.

वुमन्स आशिया कप स्पर्धा 1984 पासून सुरु आहेत. यंदा या स्पर्धेचं 17वं पर्व आहे. भारताने 8 वेळा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. तर श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018, 2023 साली जेतेपद मिळवलं आहे. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 साली चषकावर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने 2000 आणि 2012 साली जेतेपद मिळवलं आहे. तर बांग्लादेशला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.

बांग्लादेशने तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पण तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली. 2012 साली पाकिस्तानने पराभवाची धूळ चारली. त्यानंतर 2016 आणि 2018 मध्ये भारताने बांग्लादेशला अंतिम फेरीत पराभूत केलं आहे. आता भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळतं? याकडे लक्ष लागून आहे. भारतीय खेळाडूंचा फॉर्म पाहता बांग्लादेशला कठीण जाणार हे नक्की आहे.