टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे 15 खेळाडू ठरले! ‘या’ तारखेपर्यंत राखावा लागेल फॉर्म

| Updated on: Mar 01, 2024 | 4:44 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तीन महिन्यांचा आवधी शिल्लक आहे. यासाठी बीसीसीआयने आतापासूनच कंबर कसली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तसेच 11 वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ करेल असा विश्वास आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे 15 खेळाडू ठरले! या तारखेपर्यंत राखावा लागेल फॉर्म
टी20 वर्ल्डकपसाठी या 15 खेळाडूंवर लागणार डाव! फक्त या तारखेपर्यंत करावी लागेल मेहनत
Follow us on

मुंबई : क्रीडाविश्वात सध्या आयपीएल स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु आहे. पण बीसीसीआयचं मुख्य लक्ष्य आयसीसी टी20 वर्ल्डकप आहे. त्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार हे आधीच स्पष्ट केलं आहे. असं असताना इतर 14 खेळाडू कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत संघ कधी घोषित होणार? कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याची खलबतं सुरु आहेत. स्पोर्टतकने दिलेल्या वृत्तानुसार, स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यासाठी 1 मेपर्यंतची तारीख असेल. त्यानंतर 25 मेपर्यंत 15 सदस्यीय संघात बदल करता येतील. मात्र त्यानंतर काही बदल करायचे झाल्यास आयसीसीच्या तांत्रिक समितीची परवानगी घ्यावी लागेल. सध्याची क्रिकेटपटूंची स्थिती पाहता संभाव्य खेळाडूंबाबत क्रीडा तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयपीएल 2024 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळेल. आईपीएल सर्वात यशस्वी ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स संघातील अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते. तर रॉयल चॅलेंजर बंगळुरुच्या 3 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य खेळाडूंना आयपीएलमध्ये आपली चमक दाखवावी लागणार आहे. चमक दाखवण्याची संधी साखळी फेरीतच असणार आहे. बाद फेरीतील सामन्यांचं तसं टेन्शन नसेल. रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या यांची नावं जवळपास निश्चित असतील. पण इतर संभाव्य खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमक घालवली तर मात्र संघात खेळणं कठीण होईल.

टी20 वर्ल्डकप 2024 साठी संभाव्य टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, रवि बिश्नोई/युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशक/तुषार देशपांडे.

भारताचे साखळी फेरीतील 4 पैकी तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. तर एक सामना लॉडरहिलमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध, दुसरा सामना 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध, तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेशी, शेवटचा सामना 15 जूनला कॅनडाशी होणार आहे.