IND vs ZIM : टीम इंडियात स्थान मिळताच रियान परागकडून मोठी चूक, झिम्बाब्वेत जाण्यापूर्वी झालं असं की…

| Updated on: Jul 03, 2024 | 3:21 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असणार आहे. 6 जुलैपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यासाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात संघ जाहीर झाला आहे. या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या राजस्थान रॉयल्सच्या रियान परागला स्थान मिळालं आहे. पण या दरम्यान रियान पराग एक चूक करून बसला.

IND vs ZIM : टीम इंडियात स्थान मिळताच रियान परागकडून मोठी चूक, झिम्बाब्वेत जाण्यापूर्वी झालं असं की...
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेच्या हरारे येथे पोहोचली आहे. दिग्गज खेळाडूंनी टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता नव्या संघाची बांधणी सुरु झाली आहे. यासाठी संघात काही नवख्या खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रियान पराग, अभिषेक शर्मा आणि तुषार देशपांडे यांची संघात निवड झाली आहे. निवडीनंतर या खेळाडूंनी आपला आनंदही व्यक्त केला आहे. बीसीसीआयने एक व्हिडीओ जारी केला आहे. यात या खेळाडूंनी निवडीनंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चर्चेदरम्यान रियान परागने आपली एक चूकही कबूल केली आहे. रियान परागने सांगितलं की, भारतीय संघात निवड झाल्यानंतर पासपोर्ट आणि फोन विसरल होता. पण हरारे येथे पोहोचल्यानंतर त्याला या दोन्ही वस्तू मिळाल्या.

रियान परागचा पासपोर्ट आणि मोबाईल हरवला असता तर खूपच अडचण झाली असती. पण त्याला या दोन्ही गोष्टी मिळाल्याने जीव भांड्यात पडला आहे. रियान परागने पुढे सांगितलं की, “माझं लहानपणापासून स्वप्न होतं की टीम इंडियाचे कपडे घालून ट्रॅव्हल करायचं. आता ते पूर्ण झालं आहे.” झिम्बाब्वे दौऱ्यात रियान परागला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 16 सामन्यात 573 धावा केल्या होत्या.

अभिषेक शर्मा यानेही बीसीसीआय टीव्हीवर सांगितलं की, ‘जेव्हा टीम इंडियात निवड झाली तेव्हा शुबमन गिलचा फोन आला होता.’ झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल लहानपणीने मित्र आहेत. हे दोघंही युवराज सिंगचे शिष्य आहेत. अभिषेक शर्मा पहिल्याच मालिकेत आपली छाप सोडण्यास सज्ज आहे. या मालिकेतील कामगिरी खेळाडूंचा मार्ग प्रशस्त करणार आहे.

झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.