ऋषभ पंतच्या कमबॅकमुळे कांगारुंची उडाली दाणादाण, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दिली जाहीर कबुली

| Updated on: Sep 24, 2024 | 2:48 PM

भारत बांग्लादेश कसोटी मालिका सुरु असून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात अश्विन-जडेजा, शुबमन गिल यांच्यासह ऋषभ पंतची खेळी जबरदस्त राहिली. त्याची खेळी पाहून ऑस्ट्रेलियाला घाम फुटला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने याबाबत जाहीर कबुली दिली आहे.

ऋषभ पंतच्या कमबॅकमुळे कांगारुंची उडाली दाणादाण, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दिली जाहीर कबुली
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तसेच तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठेल अशीच स्थिती आहे. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून 9 सामने खेळायचे आहेत. या सामन्यातील कामगिरीवर भारताचं पुढचं गणित ठरणार आहे. बांगलादेशविरुद्ध एक सामना शिल्लक असून त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यामुळे ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाने आधीपासूनच धास्ती घेतली आहे. 1991-92 नंतर दोन्ङी संघात पहिल्यांदाज पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारताने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत खऱ्या अर्थाने भारताचा कस लागणार आहे. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाला ऋषभ पंतची खेळी पाहून घाम फुटला आहे. पंतने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी करून आपला आक्रमक बिनधास्त अंदाज दाखवून दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं भीती व्यक्त केली आहे.

कमिन्सने स्टार स्पोर्ट्सशी चर्चा करताना सांगितलं की, पंत एक असा खेळाडू की त्याच्या मागच्या काही मालिकांमध्ये प्रभाव दिसला आहे. ऑस्ट्रेलियन संघाला त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मागच्या दोन मालिकांमध्ये ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाची हवा काढली होती. त्यामुळे कमिन्सने त्याच्या खेळीची तुलना थेट ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श याच्याशी केली आहे. ‘प्रत्येक संघात असे एक किंवा दोन खेळाडू असतात. जे सामन्याचं चित्र बदलू शकतात.’, असं पॅट कमिन्स म्हणाला.

ऋषभ पंतचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्याने 12 कसोटी सामन्यात 62.40 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 159 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गाबामध्ये ऋषभ पंतने नाबाद 89 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला होता. भारतीय संघाने 32 वर्षानंतर पहिल्यांदाच या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करत 2-1 ने मालिका जिंकली होती. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी असणार आहे.