भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी इराणी कप 2024 स्पर्धेसाठी निवड समितीने रेस्ट ऑफ इंडियाच्या संघाची घोषणा केली आहे. मुंबई संघाविरूद्धच्या सामन्यासाठी निवड समितीने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. रेस्ट ऑफ इंडिया संघाचं पुणेकर ऋतुराज गायकवाड नेतृत्व करणार आहे. तर अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मुंबई यांच्यातील हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील हा सामना मुंबईत पार पडणार होता. मात्र पावसामुळे हा सामना लखनऊमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ध्रुव जुरेल आणि यश दयाल या दोघांना रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान देण्यात आलं आहे. या दोघांना बांग्लादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. बांग्लादेश संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारत-बांगलादेश दुसरा सामना हा 27 सप्टेंबरपासून होणार आहे. ध्रुव जुरेल, यश दयाल यासह मुंबईकर सरफराज खान याचीही बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सरफराज खान यालाही मुक्त केलं जाऊ शकतं. मात्र सरफराजला टीम इंडियातून रिलीज केलं जाणार की नाही हे संधी मिळणार की नाही? यावरुन निश्चित होईल.
इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा
🚨 NEWS 🚨
Rest of India squad for ZR Irani Cup 2024 announced.
Details 🔽 #IraniCup | @IDFCFIRSTBankhttps://t.co/7TUOgRc3bu
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 24, 2024
इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यू इश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)*, इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल *, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर.