T20 Cricket : लोकप्रिय स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना केव्हा?

| Updated on: Jan 16, 2025 | 9:07 PM

बीसीसीआयने लोकप्रिय टी 20 क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. जाणून घ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार आहे?

T20 Cricket : लोकप्रिय स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना केव्हा?
mumbai indians fan
Image Credit source: mumbai indians facebook
Follow us on

भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयकडून वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ‘वूमन्स प्रीमियर लीग’ आणि बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. या स्पर्धेला 14 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 15 मार्चला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील सामने एकूण 4 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेचं 4 शहरांमध्ये आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 8 सामने खेळणार आहे. पॉइंट्स टेबलमधील टॉप 2 टीम फायनलसाठी थेट क्वालिफाय करतील.

5 संघ 22 सामने आणि 4 शहरं

क्रिकेट चाहत्यांना 14 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान एकूण 5 संघांमध्ये 1 ट्रॉफीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. देशातील एकूण 4 शहरांमध्ये 22 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार मुंबई, बंगळुरु, बडोदा आणि लखनौ या शहरांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत.

वूमन्स प्रीमियर लीग 2025 चं वेळापत्रक

पहिल्या सामन्यात कोण भिडणार?

साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी 14 फेब्रुवारीला गुजरात जायंट्स विरुद्ध गतविजेता रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामना हा 11 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे. तसेच 13 मार्चला एलिमिनेटर तर 15 मार्चला अंतिम सामना पार पडेल. या सर्व सामन्यांना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

कोणत्या शहरात किती सामने?

बडोद्यात 6, बंगळुरुत 8,लखनौ आणि मुंबईत प्रत्येकी 4-4 सामने खेळवण्यात येणार आहेत. बडोद्यात 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यानचे सामने बंगळुरुत पार पडतील. त्यानंतर लखनौत 3 ते 8 मार्च दरम्यान 4 सामन्यांचा थरार रंगेल. तर सर्वात शेवटी मुंबईत 10 ते 15 मार्च दरम्यान 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 4 पैकी 2 सामने हे साखळी फेरीतील असणार आहेत. तर 13 मार्चला एलिमिनेटर तसेच 15 मार्चला अंतिम सामना पार पडेल.