बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सोमवारी 26 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली. बीसीसीआय सचिवांच्या घोषणेमुळे महिला-ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे. जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महिला आणि ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात येतं. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम, असं या पुरस्काराचं स्वरुप असतं. तर संपूर्ण मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात येतं. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम हे या पुरस्काराचं स्वरुप असतं.
“देशांतर्गत महिला आणि ज्यूनिअर क्रिकेट स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ आणि ‘मॅन ऑफ मॅच’ पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे या पुरुषांच्या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला रक्कम दिली जाणार आहे”, असं जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
“याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्रोत्साहन देणं आणि त्याची ओळख तयार करणं हे उद्देश होतं. यासाठी एपेक्स काउन्सिलने सहकार्य केलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आम्ही सर्व आपल्या खेळाडूंसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जय हिंद”, असंही बीसीसीआय सचिवांनी म्हटलंय.
जय शाह यांची मोठी घोषणा
We are introducing prize money for the Player of the Match and Player of the Tournament in all Women’s and Junior Cricket tournaments under our Domestic Cricket Programme. Additionally, prize money will be awarded for the Player of the Match in the Vijay Hazare and Syed Mushtaq…
— Jay Shah (@JayShah) August 26, 2024
बीसीसीआयने गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या विजयी रक्कमेत वाढ केली होती. त्यानुसार रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 5 कोटी रोख रक्कम देण्यात आली. तसेच इराणी कप स्पर्धेच्या विजयी रक्कमेत दुप्पटीने वाढ करण्यात आली. त्यानुसार 25 ऐवजी 50 लाख रुपये देण्यात आले. तर उपविजेत्यांना 25 लाख रुपये देण्यात आले.
तसेच दुलीप ट्रॉफी विजेत्या संघाला 1 कोटी तर उपविजेत्यांना 50 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर विजय हजारे स्पर्धेतील विजयी संघालाही 1 कोटी तर उपविजेत्यांना 50 लाख रुपये दिले जातील.