माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीने बजावला समन्स, नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या

| Updated on: Oct 03, 2024 | 5:44 PM

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अझरुद्दीनला समन्स बजावला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याचं नाव पुढे आलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं प्रकरण

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीने बजावला समन्स, नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या
Follow us on

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अझरुद्दीनचं नाव पुढे आलं आहे. ईडीने अझरुद्दीनला पहिला समन्स पाठवला आहे. त्याला गुरुवारी ईडीसमोर हजर व्हायचं होतं पण त्याने जाणं टाळलं. त्याने हजर राहण्यासाठी वेळ मागितला, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.काही काळ मोहम्मद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. 2019 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनची नियुक्ती हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी केली होती. पण दोन वर्षातच म्हणजे जून 2021 मध्ये हे पद सोडावं लागलं होतं. त्यावेळेस अझरुद्दीवर 20 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता. हे पैसे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि कॅनोपीसाठी देण्यात आले होते.

ईडीचा आरोपानुसार, एचसीएने खासगी कंपनीला स्टेडियमशी निगडीत कामं वाढीव दरात करण्याचा ठेका दिला. यामुळे क्रिकेट असोसिएशनचं कोट्यवधि रुपयांचं नुकसान झालं. या प्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.ईडीने तेलंगानामध्ये 9 ठिकाणी छापेमारी केली होती आणि महत्त्वाचे दस्ताऐवज आणि डिजिटल उपकरणं जप्त केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुढच्या काळात आणखी गाजणार यात शंका नाही.

मोहम्मद अझरुद्दीन याच्यावर यापूर्वी मॅच फिक्सिंगचा आरोप झाला आहे. या आरोपानंतर मोहम्मद अझरुद्दीवर आजन्म क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. 2012 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टने त्यांच्यावरील बंदी हटवली होती. कोर्टाने ही बंदी बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला होता. अझरुद्दीन भारतीय संघाचा सर्वात युवा कर्णधारांपैकी एक आहे. 1989 मध्ये त्याने कर्णधारपद हाती घेतलं होतं. त्याने 47 कसोटी आणि 174 वनडे सामन्यात कर्णधारपद भूषविलं आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित भारताने 14 कसोटी आणि 90 वनडे सामने जिंकले आहेत.

अझरुद्दीन 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर मुरादाबाद, यूपी येथून खासदार झाला होते. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी राजस्थानमधून लढवली होती, पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं.  2018 मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.