टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवताच गौतम गंभीरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

| Updated on: Jun 30, 2024 | 1:30 AM

टी20 वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न अखेर टीम इंडियाने खरं करून दाखवलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने विजय मिळवला आहे. 11 वर्षानंतर टीम इंडियाने आयसीसी चषकावर नाव कोरलं आहे. जेतेपदाच्या दोन तीन संधी चालून आल्या पण अपयश पदरी पडलं. अखेर यश मिळवलं. या यशानंतर गौतम गंभीरने शुभेच्छा दिल्या आहेत.

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवताच गौतम गंभीरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील विजयानंतर टीम इंडिया कात टाकणार यात शंका नाही. प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा शेवट असणार हे राहुल द्रविडने आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या पदावरील व्यक्तीचं नाव दोन तीन दिवसात स्पष्ट होईल. दुसरीकडे, संघातील वरिष्ठ खेळाडू पुन्हा टी20 क्रिकेट खेळताना दिसणं कठीण आहे. त्यात विराट कोहलीने विजयानंतर या फॉर्मेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणाही केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया या दौऱ्यावर जाणार आहे. असं सर्व असताना गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कोण असणार याची चर्चा रंगली आहे. या शर्यतीत गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी असल्याचं बीसीसीआय सूत्रांकडून कळलं आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या प्रत्येक प्रतिक्रियेची बातमी होणार यात शंका नाही. टीम इंडियाने जेतेपद मिळवल्यानंतर गौतम गंभीर काय बोलतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. गौतम गंभीरने एका शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

गौतम गंभीरने एक शब्दाचं ट्वीट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहे. गौतम गंभीरने ‘चॅम्पियन’ इतकं लिहून भारताचे झेंडे टाकले आहे. या ट्वीटकडे बऱ्याच बाजूने बघितलं जात आहे. कारण टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाचा माळ गळ्यात पडल्यानंतर इथून पुढे 3.5 वर्षे टीम इंडियाची सूत्र हाती घ्यायची आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, चॅम्पियन्स ट्रॉफी,टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप या कार्यकाळात येणार आहे.

टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकन संघ फक्त 169 धावा करू शकला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून जसप्रीत बुमराहचा गौरव करण्यात आला. तर विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.