IND vs AUS : शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने विचारले पाच प्रश्न, कोण जिंकलं पाहा Video

| Updated on: Sep 25, 2023 | 5:12 PM

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. दुसऱ्या सामन्यात शुबमन आणि श्रेयस यांच्या शतकी खेळीने लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर बीसीसीआयने या दोघांना आमनेसामने आणलं आणि एक स्पर्धा घेतली.

IND vs AUS : शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने विचारले पाच प्रश्न, कोण जिंकलं पाहा Video
IND vs AUS : शतकी खेळी करणाऱ्या शुबमन आणि श्रेयस यांना बीसीसीआयने आणलं आमनेसामने, कोणी मारली बाजी? Watch Video
Image Credit source: Video Screenshot
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट टीम इंडियाने पास केली आहे. आशिया कप 2023 स्पर्धेचं जेतेपद जिंकली. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. इतकंच काय तर भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना लय सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या खेळाडूंना सूर गवसत नव्हता. त्यांनी वनडे वर्ल्डकपसाठी आपली निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे. सूर्यकुमार यादव यानेही सलग दोन अर्धशतकं ठोकली. शुबमन गिल याचा फॉर्म कायम आहे. तर श्रेयस अय्यर याला सूर गवसल्याने संघ व्यवस्थापनचा जीव भांड्यात पडला आहे. श्रेयस आशिया कपमध्ये दुखापतीमुळे शेवटच्या सामन्यांना मुकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या सामन्यात धावचीत होत तंबूत परतला होता.  दुसऱ्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या श्रेयस अय्यरने शतक ठोकलं. शुबमन गिल आणि श्रेयसने दुसऱ्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. सामन्यानंतर बीसीसीआयने या दोघांचा प्रश्नोत्तरांचा सामना घेतला.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. श्रेयस आणि शुबमन गिल यांच्यात ही स्पर्धा होती. अपेक्षेप्रमाणे ही स्पर्धा शुबमन गिलने जिंकली. या दोघांना खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातील प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न असा विचारण्यात आला की, दोघांनी किती धावांची भागीदारी केली? याचं उत्तर दोघांनी बरोबर दिलं. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली होती.

सामन्यात दोघांनी किती चेंडूत किती धावा केल्या असा दुसरा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर दोघांनी बरोबर दिलं.  गिलने 97 चेंडूत 104 धावा, अय्यरने 90 चेंडूत 105 धावा केल्या होत्या. तिसऱ्या प्रश्नात अय्यरची दांडी गुल झाली. शतकी खेळी पूर्ण केली तेव्हा कोणता गोलंदाज गोलंदाजी करत होता? असा प्रश्न विचारला गेला. यावर गिलने अचूक उत्तर दिलं. मात्र अय्यरने मोघम उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अय्यरने शतक ठोकलं तेव्हा अॅडम झम्पा गोलंदाजी करत होता. तर गिलने शतक ठोकलं तेव्हा सीन एबट गोलंदाजी करत होता.

दोघांनी किती षटकार ठोकले असा चौथा प्रश्न विचारण्यात आला. दोघांनाही याचं उत्तर देता आलं नाही. दोघांनी चुकीचं उत्तरं दिली. त्यानंतर पाचव्या प्रश्नाचं उत्तर दोघांनी अचूक दिलं. दोघा पार्टनर्संनी आतापर्यंत किती वनडे शतकं ठोकली आहेत? त्यावर त्यांनी न चुकता उत्तर दिलं.