IND vs BAN : टीम इंडियाने बांगलादेशला लोळवल्यानंतर कॅप्टन सूर्याने काय म्हटलं?

| Updated on: Oct 06, 2024 | 11:33 PM

India vs Bangladesh 1st T20i: टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करुन 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने काय म्हटंल?

IND vs BAN : टीम इंडियाने बांगलादेशला लोळवल्यानंतर कॅप्टन सूर्याने काय म्हटलं?
Suryakumar yadav post match presentation
Follow us on

टीम इंडियाने बांगलादेशवर ग्वाल्हेरमधील न्यू माधवराव शिंदे स्टेडियममधील पहिल्या टी 20I सामन्यात 7 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने आधी टॉस जिंकून बांगलादेशला 127 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे भारताला 128 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान हार्दिक पंड्या याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या दोघांनी 29 धावा जोडल्या. तर पदार्पणवीर नितीश रेड्डी आणि अभिषेक शर्मा दोघांनी 16-16 धावांचं योगदान दिलं.

त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 19.5 ओव्हरमध्ये बांगलादेशला गुंडाळलं. संघात जवळपास 3 वर्षांनी परतलेल्या वरुण चक्रवर्थी आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 3-3 विकेट्स घेत बांगलादेशचा अर्धापेक्षा जास्त संघ माघारी पाठवला. तर मयंक यादव, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने 1-1 विकेट घेतली. भारतीय खेळाडूंनी केलेल्या या कामगिरीचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर उल्लेख केला.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“आम्ही फक्त आमच्या खेळाडूंमधील असलेल्या गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या टीम मीटिंगमध्ये जसं आणि जे ठरवलेलं ते कामी आलं. नवीन मैदानावर मुलांनी (खेळाडूंनी) ज्याप्रकारे कॅरेक्टर दाखवलं, तसेच आम्ही ज्याप्रकारे बॅटिंग केली, ते छान होतं”, असं सूर्याने स्पष्ट केलं. सूर्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान बोलत होता.

“प्रत्येक वेळी तुमच्याकडे अतिरिक्त पर्याय असतो, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक सामन्यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकता. खेळातील विविध आघाड्यांवर सुधारणेसाठी वाव असतो. आम्ही पुढील सामन्यात काय करायंच हे ठरवू”, असं सूर्याने स्पष्ट केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), परवेझ हुसैन इमॉन, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम.