IND vs BAN: अश्विन-जडेजाची निर्णायक भागीदारी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 376 धावा, हसन महमूदचा ‘पंजा’

| Updated on: Sep 20, 2024 | 11:14 AM

India vs Bangladesh 1st Test R Ashwin And Ravindra Jadeja : बांगलादेशने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करत टीम इंडियाचे उर्वरित 4 विकेट्स झटपट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाचा डाव हा 376 धावांवर आटोपला.

IND vs BAN: अश्विन-जडेजाची निर्णायक भागीदारी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 376 धावा, हसन महमूदचा पंजा
r ashwin and ravindra jadeja ind vs ban 1st test
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

टीम इंडियाचा बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिला डाव हा दुसऱ्या दिवशी 376 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 80 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 37 धावांच्या मोबदल्यात झटपट 4 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाने या 4 विकेट्स पहिल्या 75 मिनिटात गमावल्या. त्यामुळे बांगलादेश टीम इंडियाला 400 च्या आत रोखण्यात यशस्वी ठरली. टीम इंडियासाठी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला 375 पार मजल मारता आली. बांगलादेशकडून हसन महमूद याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

रवींद्र जडेजा 86* आणि आर अश्विन 102* धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र जडेजा 86 धावांवरच आऊट झाला. त्यानंतर आकाश दीप 17 धावा करुन माघारी परतला. आर अश्विन याने 133 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावांची खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराह 7 धावांवर आऊट झाला यासह भारताचा डाव हा 91.2 षटकांमध्ये आटोपला.

त्याआधी पहिल्या दिवशी बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित शर्मा 6, शुबमन गिल 0 आणि विराट कोहली 6 धावा करुन बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाची 3 बाद 34 अशी स्थिती झाली. त्यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. त्यानतंर पंत 52 बॉलमध्ये 39 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर टीम इंडियाने सलग 2 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावल्या. यशस्वी आणि केएल राहुल आऊट झाले. यशस्वीने 56 आणि केएलने 16 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 6 बाद 144 अशी स्थिती झाली होती.

अश्विन-जडेजाची भागीदारी

अश्विन-जडेजा या अनुभवी जोडीने अडचणीत असलेल्या टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी पहिल्या दिवसापर्यंत सातव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. त्यामुळे या जोडीकडून दुसऱ्या दिवशी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या दिवशी बांगलादेशने भारताला रोखलं. बांगलादेशकडून हसन महमूद याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तास्किन अहमद याने तिघांना आऊट केलं. तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज याला माघारी पाठवलं.

बांगलादेशने भारताला 400 च्या आत रोखलं

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.