टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. वाईट प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. वाईट प्रकाशामुळे काही मिनिंट खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असल्याचं जाहीर करण्यात आलं. बांगलादेशने दुसऱ्या डावात 37.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी आणखी 357 धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयी सलामीपासून फक्त 4 विकेट्स दूर आहे. टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 227 धावांची आघाडी होती. तर भारताने दुसरा डाव हा 4 बाद 278 धावांवर घोषित केला. त्यामुळे बांगलादेशला 515 धावांचं आव्हान मिळालं.
दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. पंत आणि शुबमन या दोघांनी वैयक्तिक शतकी खेळी केली. पंतने 109 धावांचं योगदान दिलं. तर डाव घोषित केला तेव्हा शुबमन 119 आणि केएल राहुल 22 धावांवर नाबद परतले. तर त्याआधी दुसऱ्या दिवशी रोहित, यशस्वी आणि विराट या तिघांनी अनुक्रमे 5, 10 आणि 17 अशा धावा केल्या होत्या. तिथून पंत आणि शुबमनने पूर्ण दिवस खेळून काढला आणि तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाला 500 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराज याने 2 विकेट्स घेतल्या. तर तास्किन अहमद आणि नाहिद राणा या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
बांगलादेशने 515 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ठराविक अंतराने झटके देत तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 4 झटके देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली . यशस्वी जयस्वाल याने गलीमध्ये झाकीर हसन याचा अप्रतिम कॅच घेतला. झाकीरने 33 धावा केल्या. त्यानंतर शादमन इस्लाम 35 धावांवर झेलबाद झाला. मोमिनूल हक याने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर केएल राहुल याने मुश्फिकुर रहीम याचा 13 रन्सवर अप्रतिम असा कॅच घेतला. भारताकडून आर अश्विन याने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट मिळवली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॅप्टन नजमूल हुसेन शांतो 51 आणि शाकिब अल हसन 5 धावांवर नाबाद परतले. बांगलादेशने 37.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याआधी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला 150 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. भारताने पहिल्या डावात केलेल्या 376 च्या प्रत्त्युतरात बांगलादेशला 149 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला 227 धावांची आघाडी मिळाली. आता चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशला पहिल्याच सत्रात गुंडाळून विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
तिसऱ्या दिवसाचा गेम ओव्हर
Bad light brings an end to the day’s play.
Bangladesh 158/4, need 357 runs more.
See you tomorrow for Day 4 action 👋
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7JWYRHXQuY
— BCCI (@BCCI) September 21, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.