IND vs BAN : आर अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

| Updated on: Sep 19, 2024 | 5:17 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी भारत बांग्लादेश कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. पण पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत बांगलादेशचं वर्चस्व राहिलं. पण त्यानंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने गोलंदाजांची पिसं काढली.

IND vs BAN : आर अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा
Image Credit source: BCCI
Follow us on

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने 6 गडी बाद 339 धावा केल्या आहेत. तर आर अश्विन नाबाद 102 आणि रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर खेळत आहेत. 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती असताना कोणलाही वाटलं नाही की 300 पार धावसंख्या होईल. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सर्वांना खोटं पाडलं. या जोडीने सातव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. तसेच भारताला चांगल्या स्थितीत आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रवींद्र जडेजाला शतकासाठी अवघ्या 14 धावांची अवश्यकता असून पहिल्या सत्रात तो कामगिरी चोख बजावेल अशी आशा आहे. दुसरीकडे, भारताने पहिल्या दिवशीचा खेळ बांगलादेशच्या पारड्यातून खेचून आणला आहे.

पहिल्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ पाहिला तर लोकांना सामना बघायचं सोडून दिलं होतं. पाकिस्तानसारखी स्थिती होईल अशी भीती लागून होती. रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. तर त्यानंतर आलेला शुबमन गिल तर खांतही खोलू शकला नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाही. अवघ्या 6 धावा करून बाद झाला. हसन महमूद पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर भारी पडला. यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने 60 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत 39 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल काही करतील अशी भाबडी आशा होती. पण यशस्वीने 118 चेंडूत 56 धावा केल्या आणि तंबूत परतला. तो बाद होत नाही तोच केएल राहुलची खेळी 16 धावांवर संपुष्टात आली.

बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वात चांगला स्पेल टाकला. त्याने आघाडीचे महत्त्वाचे विकेट घेतल्या. नहीद राणा आणि मेहदी हसन मिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. पण त्यांना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी काय फोडता आली नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.