IND vs BAN: अश्विनचा पंजा, टीम इंडियाचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा

| Updated on: Sep 22, 2024 | 12:05 PM

India vs Bangladesh 1st Test Match Highlights: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध विजयी सलामी दिली आहे. लोकल बॉय आर अश्विन याने घरच्या मैदानात बॅटिंग आणि बॉलिंगने शानदार कामगिरी केली.

IND vs BAN: अश्विनचा पंजा, टीम इंडियाचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा
R Ashwin ind vs ban
Image Credit source: Bcci
Follow us on

टीम इंडियाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशचा डाव या विजयी आव्हानाच्या प्रत्युत्तरात 234 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांना फार काही करता आलं नाही. टीम इंडियाकडून लोकल बॉय आर अश्विन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी त्याला चांगली साथ देत बांगलादेशला गुंडाळण्यात योगदान दिलं. टीम इंडियाने अशाप्रकारे 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अश्विनने पहिल्या डावात बॅटिंगने धमाका करत कारकीर्दीतील सहावं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही.मात्र अश्विनने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. अश्विनची 5 विकेट्स घेण्याची ही 37 वी वेळ ठरली. अश्विनने यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याच्या 37 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. अश्विनला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

पहिल्या डावात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. रोहित, यशस्वी आणि विराट झटपट बाद झाले. मात्र त्यांतर अश्विनने 113 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 376 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर रोखत 227ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी शतकं केली. त्या जोरावर भारताने दुसरा डाव हा 4 बाद 287 धावांवर घोषित केला. त्यामुळे बांगालदेशला 515 धावांचं अवघड आव्हान मिळालं.

सामन्यातील चौथ्या दिवशी अश्विनने 6 आणि जडेजाने 3 विकेट्स घेत बांगलादेशचा बाजार 234 धावांवर उठवला. बांगलादेशने 4 बाद 158 धावसंख्येपासून चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. नजमूल शांतो आणि शाकिब अल हसन या दोघांनी दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 2 तासांच्या आतच 6 झटके देत ऑलआऊट केलं.

टीम इंडियाचा 280 धावांनी विजय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.