IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी, कारण की…

| Updated on: Aug 02, 2024 | 2:39 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना होत आहे. दरम्यान भारताचा या वर्षातील पहिला वनडे सामना आहे. या वर्षात भारतीय संघ टी20 सामने खेळला होता.

IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी, कारण की...
Image Credit source: Twitter
Follow us on

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. या मैदानात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा दिसला आहे. त्यामुळे श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. या खेळपट्टीवर 270 च्या आसपास धावसंख्या होऊ शकते असा अंदाज आहे. असं असताना भारतीय संघाच्या हातावरील काळ्या पट्टीने लक्ष वेधून घेतलं आहे. काही जणांना या मागचं कारण माहिती आहे. तर काही जणांना असं का? असा प्रश्न पडला आहे. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला येथे मिळेल. दोन दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं होतं. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत.

अंशुमन गायकवाड यांचं 31 जुलै 2024 रोजी निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर व्यवस्थितरित्या उपचार व्हावे यासाठी बीसीीसआयने त्यांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली होती. पण अंशुमन गायवाड यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी दिवंगत अंशुमन गायकवाड यांना पहिल्या सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने या संदर्भात ट्वीट करून माहितीही दिली आहे.

दुसरीकडे, भारतीय संघ या वर्षातला पहिला वनडे सामना खेळत आहे. टी20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही एकही वनडे सामना झाला नव्हता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. येथून पुढे स्पर्धेपर्यंत संघाची पायाभरणी केली जाणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.