IND vs ZIM : शतकी खेळी करूनही अभिषेक शर्माचं संघातील स्थान संकटात! नेमकं काय झालं ते जाणून घ्या

| Updated on: Jul 08, 2024 | 10:41 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताने 1-1 ने बरोबरी केली आहे. तिसरा टी20 सामना हरारेमध्ये बुधवारी खेळला जाईल. पण या सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनबाबत डोकेदुखी वाढली आहे. काय झालं ते जाणून घेऊयात..

IND vs ZIM : शतकी खेळी करूनही अभिषेक शर्माचं संघातील स्थान संकटात! नेमकं काय झालं ते जाणून घ्या
Follow us on

झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. पहिला सामना 13 धावांनी गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला 100 धावांनी मात दिली. दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. अभिषेक शर्माने 47 चेंडूत शतकी खेळी केली. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर उपस्थित झालेलं प्रश्नचिन्ह दुसऱ्या सामन्यातच संपुष्टात आलं आहे. पण इतकी जबरदस्त खेळी करूनही तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की नाही याबाबत साशंकता आहे. शतकी खेळी करूनही प्लेइंग 11 डावललं जाण्याची चर्चा होण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात. त्याचं झालं असं की टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघातील यशस्वी जयस्वाल झिम्बाब्वेला पोहोचला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळालं नाही. विराट रोहित शर्मामुळे त्याला संधी मिळणं कठीण झालं होतं. आता मात्र तसं नाही. नवख्या संघात त्याला डावलणं कठीण आहे. कारण मागच्या एका वर्षात त्याने टी20 आणि कसोटीत स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे.

यशस्वी जयस्वाल हरारेत पोहोचल्याने त्याचं प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणं जवळपास निश्चित आहे. पण प्रश्न असा आहे की यशस्वी ओपनर आहे तर तो अभिषेक शर्माच्या जागी खेळणार का? त्यामुळे अभिषेक शर्माचं स्थान संकटात आलं आहे. कारण अभिषेक शर्मा शुबमन गिलसोबत ओपनिंग करतो. जयस्वालही ओपनर असून दुसऱ्या पोझिशनवर खेळत नाही. त्यामुळे आता टीम व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. अभिषेक शर्माला डावलणंही वाटतं तितकं सोपं नाही. कारण तो अष्टपैलू खेळाडू असून लेफ्ट आर्म स्पिनरही आहे. मधल्या षटकात विरोधी संघांना फिरकीत अडकवू शकतो.

आता टीम इंडिया मॅनेजमेंट यशस्वीला कोणाच्या जागेवर संधी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा यशस्वी जयस्वालला टी20 वर्ल्डकप स्पर्धेसारखं बेंच बसावं लागू शकतं. तसेच रिंकू सिंह किंवा रियान परागवर तडी पडू शकते.  चांगल्या खेळाडूंचे पर्याय असल्याने टीम इंडियाला प्लेइंग निवडताना चांगली डोकेदुखी ठरणार आहे. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे आल्याने साई सुदर्शनला, हर्षित राणा आणि जितेश शर्मा स्क्वॉडमधून बाहेर जावं लागणार आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध तिसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

शेवटच्या तीन टी20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, ध्रुव जुरेल, तुषार देशपांडे, रियान पराग.