IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी धक्का, स्टार ऑलराउंडर सीरिजला मुकण्याची शक्यता?

| Updated on: Oct 10, 2024 | 3:45 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाला या मालिकेपूर्वी धक्का बसला आहे.

IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी धक्का, स्टार ऑलराउंडर सीरिजला मुकण्याची शक्यता?
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ प्रमुख दावेदार आहेत. सध्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी असून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्याची कसोटी मालिका ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. या मालिकेतील निकालावर ऑस्ट्रेलिया मालिकेचं महत्त्व आणखी वाढणार आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली तरी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने जिंकणं भाग आहे. असं असताना दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी कंबर कसून आहेत. जराही गणित चुकलं तर शर्यतीतील इतर संघांना संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी पाच सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवत जेतेपद मिळवलं होतं. त्याची सळही भारतीय क्रिकेटपटूंच्या मनात घर करून आहे. त्यामुळे ही मालिका सर्वार्थाने महत्त्वाची ठरणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन या मालिका मुकण्याची शक्यता आहे. कारण कॅमरून ग्रीनला पाठीच्या दुखापतीचा गंभीर त्रास होत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळी हंगामात खेळू शकणार नसल्याचं वृत्त आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मिडिया रिपोर्टनुसार, कॅमरून ग्रीन बहुचर्चित बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत एक फलंदाज म्हणून भाग घेईल. तर शेवटच्या टप्प्यात गोलंदाजी करताना दिसेल. पण आता त्याच्या पाठीची दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही मालिका खेळण्याची शक्यता कमीच आहे. क्रिकेटेटल.कॉमनुसार, ग्रीनची दुखापत गंभीर असल्याने ऑस्ट्रेलियाला आता त्याच्याशिवाय खेळण्यासाठी योजना आखावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पत्रकार पीटर लेलॉरने सांगितलं की, ‘भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी ग्रीन रिकव्हर होण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतरही कमबॅक करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या उन्हाळी हंगामात खेळणार नाही, असंच दिसतंय.’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर, तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर, चौथा कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर आणि पाचवा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणित सोडवणार आहे.