Video : पंचांनी दिलं आऊट तरी जडेजा होता निश्चिंत, ती चूक टाळण्यासाठी धावला आणि..

| Updated on: Sep 19, 2024 | 3:26 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरु आहे. पहिल्याच सामन्यात बांगलादेशने आपलं आक्रमक रुप दाखवलं. आघाडीचे दिग्गज फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे शेपटाच्या फलंदाजांवर डाव सावरण्याची वेळ आली. पण त्यातही रवींद्र जडेजा बाद होता होता वाचला.

Video : पंचांनी दिलं आऊट तरी जडेजा होता निश्चिंत, ती चूक टाळण्यासाठी धावला आणि..
Follow us on

बांगलादेशने पहिल्या कसोटीत आपलं आक्रमद अंदाज दाखवला. आघाडीच्या फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर तग धरणं कठीण झालं. एका पाठोपाठ एक असे दिग्गज फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानसारखी स्थिती होते की काय असं धाकधूक क्रीडारसिकांना लागून आहे. असं यशस्वी जयस्वाल वगळता एकही आघाडीचा फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यशस्वी जयस्वालने 56 धावा करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. दुसरीकडे, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाज फेल गेले. शुबमनला तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे तळाच्या फलंदाजांवर ताण आला. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीकडून सर्वाधिक आशा लागून आहे. असं असताना एक क्षण रवींद्र जडेजाची विकेट पडली असंच वाटलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. हसन महमूदच्या गोलंदाजीवर पंचांनी रवींद्र जडेजाला पायचीत घोषित केलं. बांगलादेशच्या जोरदार अपीलनंतरही रवींद्र जडेजा ठाम होता. पण एक चूक नडली असती आणि ती चूक होऊ नये म्हणून जडेजाने माघारी धाव घेतली.

पंचांकडे एलबीडब्ल्यूच्या अपीलसाठी महमूद अपील करत होता. दुसरीकडे, रवींद्र जडेजा एक धाव घेण्यासाठी धाव घेत होता. पण थर्ड स्लिपच्या हाताजवळ चेंडू असल्याचं पाहून परत माघारी फिरला. पण जोरात अपील करत असलेला महमूद पाठमोरा तिथपर्यंत पोहोचला. त्याला रवींद्र जडेजाने रनआऊट होऊ नये यासाठी उडी मारली हे माहिती नव्हतं. तेव्हा त्याच्या पायात पाय अडकला आणि महमूद त्याच्या अंगावर पडला. त्याच्या धडपडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 50 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हा प्रकार घडला. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने घेतलेला रिव्ह्यू योग्य ठरला आणि पंचांनी नाबाद असल्याचं घोषित केलं.

दरम्यान, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाची लाज राखली. सातव्या विकेटसाठी दोघांनी 80 हून अधिक धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 220 हून अधिक धावा करता आल्या. या दोघांची भागीदारी झाली नसती तर टीम इंडियाची स्थिती नाजूक असती. खरं तर पहिल्याच दिवशी पाकिस्तान संघासारखी स्थिती होऊन बसली असती.