IPL 2024 : “पंड्याची औकात आहे काय?” मुंबईच्या पराभवानंतर समर्थक आक्रमक

| Updated on: Apr 02, 2024 | 8:05 PM

Mumbai Indians vs Rajasthan Royals Ipl 2024 : मुंबईच्या चाहत्यांचा हार्दिक पंड्यावरील राग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईचा सलग तिसरा पराभव झाल्यानंतर चाहते आक्रमक झाले आहेत.

IPL 2024 : पंड्याची औकात आहे काय? मुंबईच्या पराभवानंतर समर्थक आक्रमक
hardik pandya,
Follow us on

मुंबई इंडियन्सच्या आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पराभवाची मालिका घरच्या मैदानातही कायम राहिली. मुंबईला 1 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं. मुंबईचा हा या हंगामातील हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील सलग तिसरा पराभव ठरला. मुंबईचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या तिघांना भोपळाही फोडता आला नाही.

तर त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या याने 34 आणि तिलक वर्मा याने 32 धावा केल्या. तर ईशान किशन याने 16 धावांचं योगदान दिलं. टीम डेव्हीड याने 17 धावांचं योगदान दिलं. या तिघांच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला 126 धावांचं आव्हान मिळालं. राजस्थानने हे आव्हान रियान पराग याच्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या मदतीने 15.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानने मुंबईवर मात करत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. तर मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

घरच्या मैदानात सामना असल्याने मुंबईच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली होती. चाहत्यांना रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची आणि पहिल्या विजयाची प्रतिक्षा होती. मात्र सर्वच उलटं झालं. रोहितला खातंही उघडता आलं नाही. तेच मुंबईसोबत झालं. मुंबईच्या पराभवाने चाहत्यांनी घोर निराशा झाली. मुंबईच्या पराभवाला टीममधील बरेच खेळाडू जबाबदार होते. मात्र मुंबईच्या चाहत्यांनी सर्व संताप हार्दिकवर काढला.

कॅप्टन हार्दिकला मुंबईच्या चाहत्यांनी पराभवासाठी कारणीभूत ठरवलं. रोहितला हटवून हार्दिकला कॅप्टन केल्याने मुंबईच्या चाहत्यांचा हार्दिकवर आधीपासून राग होताच. त्यात वानखेडेत पराभव झाल्याने चाहत्यांना टीकेची संधीच मिळाली.

मुंबईच्या पराभवानंतर चाहत्यांची प्रतिक्रिया

हार्दिक पंड्याला दुखापत झाली तरच मुंबई इंडियन्स जिंकू शकते. रोहित शर्मा किती काय करणार? हार्दिक पंड्या रोहितला लाँग ऑफला फिल्डिंगला उभा करतो. हार्दिकची औकात आहे का”, अशा शब्दात एकाने हार्दिकला सुनावलंय. सामन्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या पराभवानंतर चाहत्यांनी हार्दिकवर सडकून टीका केली आहे. “हार्दिकला गुजरातला पाठवा”,असं एका चाहत्याने म्हटलंय. तर “हार्दिकला हटवा, मुंबई जिंकायची सुरुवात होईल” असंही एका मुंबई समर्थकाने म्हटलंय. “हार्दिकला फार माज आहे”, असंही एका मुंबईच्या जर्सीतल्या चाहत्याने म्हटलंय. विविध चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील संपूर्ण प्रतिक्रिया या हार्दिक विरोधात आहेत.