IPL 2025 : बीसीसीआयचा 18 व्या मोसमाआधी मोठा निर्णय;एका सामन्यात 3 चेंडूचा वापर होणार?

| Updated on: Mar 20, 2025 | 5:49 PM

IPL 2025 Bcci : आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी बीसीसीआय लवकरच एक नव्या नियमाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका सामन्यात 3 चेंडू वापरले जाणार आहेत.

IPL 2025 : बीसीसीआयचा 18 व्या मोसमाआधी मोठा निर्णय;एका सामन्यात 3 चेंडूचा वापर होणार?
Ipl 2025 Kkr Ajinkya Rahane And Venkatesh Iyer
Image Credit source: PTI
Follow us on

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या मोसमाला (IPL 2025) 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. क्रिकेट चाहत्यांचं नेहमीप्रमाणे यंदाही या स्पर्धेसाठी उत्साह पाहायला मिळत आहे. एकूण 10 संघांचे 10 कर्णधार निश्चित झाले आहेत. तसेच सर्व संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. या 18 व्या मोसमाला अवघ्या काही तासांचा अवधी बाकी असताना बीसीसीआयने एक निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आता डे-नाईट सामन्यात 3 चेंडूचा वापर केला जाणार आहे. नक्की काय निर्णय झालाय? सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबईत आयपीएल स्पर्धेतील 10 संघांचे 10 कर्णधार एका विशेष कार्यक्रमानिमित्ताने (कॅप्टन मीट) एकत्र आले होते. या विशेष कार्यक्रमात कर्णधारांमध्ये विविध नियमांबाबत चर्चा झाली. या दरम्यान 3 बॉलबाबत निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डे-नाईट सामन्यातील पहिल्या डावात 1 बॉल वापरला जाईल. त्यानंतर दुसर्‍या डावात 2 चेंडू वापरले जातील. मात्र याबाबत आयपीएलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या डावातील 11 व्या ओव्हरनंतर नवा बॉलने पुढील खेळ खेळवण्यात येईल. मैदानात रात्री पडणाऱ्या दवमुळे (Dew) हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. दवमुळे एका संघाला फायदा होतो तर दुसऱ्या संघाला तोटा. त्यामुळे बॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच टॉस जिंकणाऱ्या संघाला दवमुळे फायदा होतो. अनेक कर्णधार डे-नाईट सामन्यात टॉस जिंकल्यानंतर ड्यू फॅक्टर लक्षात घेत बॅटिंग-फिल्डिंगचा निर्णय घेतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या डावात 11 व्या ओव्हरनंतर नव्या चेंडूने पुढील षटकं टाकली जातील, ज्यामुळे ड्यू इफेक्ट कमी होईल आणि सामना बरोबरीचा होईल. तसेच यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघालाही फायदा होणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

एका सामन्यात 3 चेंडू?

दुसऱ्या डावात फिल्डिंग करणाऱ्या टीमला कोरा करकरीत बॉल दिला जाणार की साधारण वापरण्यात आलेला चेंडू मिळणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. नवा बॉल दिल्यास बॉलिंग करणाऱ्या संघाला त्याचा फटका बसू शकतो. तसेच फिरकी गोलंदाजांना नव्या चेंडून मदत मिळत नाही. त्यामुळे या क्षणी प्रश्न अनेक आहेत. मात्र उत्तर नाही. याबाबत अजूनही या नियमाबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.