धोनी है तो मुमकीन है..! फक्त 0.12 सेकंदात सूर्यकुमार यादवला पाठवलं तंबूत Watch Video

| Updated on: Mar 23, 2025 | 10:12 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईला 20 षटकात 155 धावांपर्यंत मजल मारता आली. या डावात महेंद्रसिंह धोनीने घातक अशा सूर्यकुमार यादवचा 0.12 सेकंदात खेळ खल्लास केला.

धोनी है तो मुमकीन है..! फक्त 0.12 सेकंदात सूर्यकुमार यादवला पाठवलं तंबूत Watch Video
Image Credit source: Screenshot/Star Sports
Follow us on

आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले. या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम खराब झाली होती. सुरुवातीला तीन धक्के बसल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून फार अपेक्षा होती. पण सूर्यकुमार यादवची खेळी 29 धावांवर आटोपली. महेंद्रसिंह धोनीने ज्या वेगाने स्टम्पिग केली ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महेंद्रसिंह धोनीने फक्त 0.12 सेकंदात सूर्यकुमार यादवला तंबूचा रस्ता दाखवला. सुरुवातीला सूर्यकुमार यादवला काहीच कळलं नाही. धोनीचा वेग पाहून त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंह धोनी वयाच्या 43 वर्षी अजूनही तोच धोनी असल्याचं दाखवून दिलं. महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर असल्याचं दाखवून दिलं आहे. धोनी विकेटच्या मागे असताना क्रीज सोडण्याची चूक महागात पडू शकते. पण ही चूक सूर्यकुमार यादवने केली आणि विकेट देऊन बसला.

मुंबई इंडियन्सचा डाव पॉवर प्लेमध्ये मंदावला होता. त्यामुळे मोठी धावसंख्या करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवने 11 व्या षटकात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. नूर अहमद टाकत असलेल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर क्रीज सोडलं आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमार यादव बीट झाला आणि धोनी हातात आलेली संधी सोडेल का? सूर्यकुमारची बॅट पूर्णपणे स्विंग व्हायच्या आत आणि पापण लवते न लवते तोच स्टंपवरील बेल्स उडाल्या.

मुंबई इंडियन्सची पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी राहिली. रोहित शर्मा खातंही खोलू शकला नाही. तर रिकलटन आणि विल जॅक्स स्वस्तात बाद झाले. तर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण काही खास करू शकले नाही. तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकलं नाही. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावा दिल्या.