Ishan Kishan: इशान किशनने अखेर मौन सोडलं, रणजी खेळलो नाही कारण…

| Updated on: Jul 08, 2024 | 8:56 PM

इशान किशनने दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडला आणि त्याच्या आयुष्यात उलथापालथीचे दिवस सुरु झाले. त्याला टीम इंडियातून वगळण्यात आलं. अफगाणिस्तान दौरा ते झिम्बाब्वे दौरा यात त्याचा कुठेच विचार केला गेला नाही. यानंतर इशान किशनने पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे.

Ishan Kishan: इशान किशनने अखेर मौन सोडलं, रणजी खेळलो नाही कारण...
Follow us on

इशान किशनची टीम इंडियात पुन्हा जागा बनणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, जितेश शर्मा यासारखे विकेटकीपर बॅट्समनमुळे संधी मिळणं आता कठीण झालं आहे. इशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याची निवड झाली. मात्र दौरा अर्धवट सोडून त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. इतकंच काय तर देशांतर्गत रणजी ट्रॉफी खेळण्यासही त्याने नकार दिला. प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही, देशांतर्गत रणजी स्पर्धा खेळण्याचा सल्ला त्याने धुडकावून लावला होता. इतकंच काय तर आयपीएलसाठी बरोड्यात सराव करताना दिसला. इशान किशनचं एकंदरीत वागणं बीसीसीआयला रूचलं नसावं आणि त्याला सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळण्यात आलं, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आता या सर्व घडामोडींवर इशान किशनने मौन सोडलं आहे.

इशान किशनने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, रणजी खेळण्याच्या मानसिकतेत नव्हता. इशान पुढे सांगितलं की, “मी ब्रेक घेतला आणि हे सामान्य आहे. तिथे एक नियम आहे की जर संघात पुनरागमन करायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागले. हे अगदी साधं आहे. पण माझ्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं खूप वेगळं होतं. कारण त्यात काहीच अर्थ नव्हता. मी खेळण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतो. यासाठीच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेऊन लगेच देशांतर्गत खेळण्यात काहीच अर्थ नव्हता. नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच खेळलो असतो.”

भारतीय संघातून वगळल्याबद्दल आणि केंद्रीय करारातून डावलल्यानंतर इशान किशन म्हणाला, “आज बऱ्याच गोष्टी विचित्र घडत आहे. सर्वकाही ठीक आहे असं मी सांगणार नाही. हे माझ्यासाठी खरंच सोपं नव्हतं. तुम्ही बरंच सोसता. माझ्या डोक्यात सुरु असतं की हे काय झालं, काय होणार, माझ्यासोबतच का. या सर्व गोष्टी जेव्हा घडला जेव्हा मी चांगली कामगिरी करत होतो. प्रवासात थकवा यायचा. माझी तब्येत बरी नव्हती. त्यासाठी मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक घेतला आणि भारतात परतलो. पण मला वाईट वाटते की माझे कुटुंब आणि जवळच्या मित्रांशिवाय मला कोणीही समजून घेत नाही.”