Asia Cup 2024 : भारत पाकिस्तान यांच्यात 19 ऑक्टोबरला टी20 क्रिकेट सामना, क्रीडाप्रेमींसाठी मोठी पर्वणी

| Updated on: Oct 14, 2024 | 3:53 PM

पाकिस्तानची क्रिकेटमधील स्थिती एकदम नाजूक झाली आहे. कोणीही यावं आणि पराभूत करून जावं अशी मानसिकता झाली आहे. असं असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत दोन्ही दिग्गज संघ आमनेसामने येणार आहेत.

Asia Cup 2024 : भारत पाकिस्तान यांच्यात 19 ऑक्टोबरला टी20 क्रिकेट सामना, क्रीडाप्रेमींसाठी मोठी पर्वणी
Follow us on

क्रिकेटमध्ये काहीही झालं तर भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की त्याबाबत एक वेगळाच उत्साह असतो. भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्येच गेल्या वर्षात आमनेसामने येतात. त्यामुळे या दोन्ही देशातील सामना क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच असते. ओमानमध्ये हे दोन दिग्गज संघ आमनेसामने येणार आहेत. मस्कटच्या ओमान क्रिकेट अकादमीत हा सामना होणार आहे. हा सामना एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत होणार आहे. हा सामना भारत ए आणि पाकिस्तान ए संघात होणार आहे. हा सामना टी20 फॉर्मेटमध्ये होणार आहे. दोन्ही संघ 19 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारताचं कर्णधारपद तिलक वर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 वनडे आणि 16 टी20 सामने खेळला आहे. तिलक वर्मासोबत उपकर्णधारपदाची धुरा अभिषेक शर्माच्या खांद्यावर असेल. तर राहुल चाहरही या संघात असून त्याच्याकडेही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामन्यांचा तीन खेळाडूंना अनुभव आहे. दुसरीकडे, संघात असलेले उर्वरित खेळाडूंनी आयपीएलमध्ये नशिब आजमावलं आहे. त्यामुळे भारताची मजबूत बाजू एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. आयुष बडोनी, रमनदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, नेहल वढेरा, अनुज रावत, ऋतिक शौकीन, साई किशोर, रासिक सलाम, वैभव अरोरा आणि आकिब खान या आयपीएल खेळलेल्या खेळाडूंचा संघात समावेश आहे. एमर्जिंग आशिया कप स्पर्धा पहिल्यांदाच टी20 फॉर्मेटमध्ये खेळवली जात आहे. यापूर्वी झालेल्या 5 पर्वात वनडे फॉर्मेट खेळवले गेले होते.

भारत आणि पाकिस्तान हे संघ स्पर्धेतील अ गटात आहेत. तसेच या गटात युएई आणि ओमान हे संघ देखील आहेत. दरम्यान, भारताने 2013 मध्ये एमर्जिंक आशिया कप जिंकला होता. तर मागच्या दोन वर्षात पाकिस्तानचा दबदबा दिसला आहे. पाकिस्तान ए संघाने मागच्या पर्वात अंतिम फेरीत भारताला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वात पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे या सामन्याकडे आता क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.