विराट कोहलीमुळे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव? वीरेंद्र सेहवागने अप्रत्यक्षरित्या साधला निशाणा

| Updated on: May 08, 2024 | 8:01 PM

टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी जेतेपदाचं स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. पण असं असलं तरी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील जखम ताजी आहे. याबाबत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग एक मोठी बाब बोलून गेला आहे. अप्रत्यक्षरित्या त्याने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

विराट कोहलीमुळे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव? वीरेंद्र सेहवागने अप्रत्यक्षरित्या साधला निशाणा
Image Credit source: PTI
Follow us on

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीत झालेला पराभव अजूनही स्मरणात आहे. संपूर्ण देशाच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र अंतिम फेरीत पराभव झाल्याने हिरमोड झाला. कोट्यवधी भारतीयांची मनं यामुळे दुखावली गेली. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वात 11 वर्षांपासून असलेला आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करता आला नाही. 19 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचं स्वप्न भंग केलं. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी वीरेंद्र सेहवागने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील जखम ताजी केली आहे. यावेळी त्याने विराट कोहलीचं नाव न घेता निशाणा साधला आहे. अप्रत्यक्षरित्या पराभवासाठी कोण जबाबदार ठरलं हे सांगून टाकलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 3 आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पराभवाचं भूत मानगुटीवर बसलं आहे.

सीएनबीसीवर 2011 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या वीरेंद्र सेहवागला प्रश्न विचारला गेला. भारतीय संघ आयसीसी चषक का जिंकत नाही? त्यावर वीरेंद्र सेहवागने जोरदार फटकेबाजी केली. तसेच झोंबणारं उत्तर देऊन टाकलं. “संघ फीयरलेस क्रिकट खेळत नाही. यासाठी भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत यश मिळत नाही.” या माध्यमातून वीरेंद्र सेहवागने विराट कोहली आणि केएल राहुलवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

“अंतिम फेरीत रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ बॅकफूटवर आला. 11 ते 40 षटकादरम्यान कोणीही आक्रमक फलंदाजी केली नाही. या दरम्यान फक्त दोन चौकार आले आणि हेच पराभवाचं कारण आहे.”, असं वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला. या षटकांदरम्यान विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सर्वाधिक फलंदाजी केली होती. त्यामुळे वीरेंद्र सेहवागने अप्रत्यक्षरित्या या दोघांवर निशाणा साधला आहे. तसेच खडे बोल सुनवत वीरेंद्र सेहवागने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मोठी शिकवण दिली आहे.

भारताने प्रत्येक सामना बाद फेरीसारखाच खेळायला हवा. वीरेंद्र सेहवागने सांगितलं की, “2007 ते 2011 पर्यंत भारतीय संघ या मानसिकतेने खेळत होता. या पद्धतीने खेळल्याने खेळाडूवरील दडपण कमी होतं. तसेच चांगल्या प्रदर्शनाची संधी वाढते.”