IND vs BAN: रोहित, शुबमन आणि विराट, टीम इंडियाला 3 मोठे धक्के, गिल आला तसाच गेला

| Updated on: Sep 19, 2024 | 11:53 AM

India vs Bangladesh 1st Test Day 1: बांगलादेशने पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रातील पहिला तास आपल्या नावावर केला आहे. बांगलादेशने 3 मोठे विकेट्स घेत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं.

IND vs BAN: रोहित, शुबमन आणि विराट, टीम इंडियाला 3 मोठे धक्के, गिल आला तसाच गेला
rohit sharma shubman gill and virat kohli
Follow us on

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रातील पहिल्या तासात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले आहेत. बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या आजी माजी कर्णधारांसह युवा शुबमन गिल असे तिघे फलंदांज ढेर झाले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशच्या गोलंदाजांनी आपला कर्णधार नजमुल हुसेन शांतो याचा फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरवला. बांगलादेशने अनुक्रमे रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली या तिघांना झटपट आऊट केलं. हसन महमूद यानेच तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली. मात्र त्यानतंर ओपनर यशस्वी जयस्वाल आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. टीम इंडियाने पहिल्या सत्राचा खेळसंपेपर्यंत 23 ओव्हरमध्ये 88 धावा केल्या. यशस्वी आणि पंत या दोघांनी नाबाद 54 धावांची भागीदारी केली आहे.

टॉस गमावल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. दोघांनी 14 धावा जोडल्या. त्यानंतर सहाव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा आऊट झाला. हसनने कॅप्टन शांतोच्या हाती रोहितला कॅच आऊट केलं. रोहितने 6 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने आठव्या ओव्हरमध्ये दुसरी विकेट गमावली. हसनने आठव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शुबमनला लिटनच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट जानेवारीनंतर कसोटी संघात परतला. त्यामुळे विराटकडून त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित होती. मात्र तसं काही झालं नाही. विराटनेही रोहितप्रमाणे 6 धावा केल्या. हसनने विराटलाही लिटनच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 9.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 34 अशी नाजूक स्थिती झाली.

त्यानंतर मात्र यशस्वी आणि ऋषभ पंत या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी या दरम्यान फटकेबाजी केली. दोघांना जीवनदान मिळालं. या जोडीने 23 ओव्हरपर्यंत जबाबदारीने खेळ करत एकही विकेट गमावली नाही. लंचपर्यंत टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून 88 धावा केल्या आहेत. यशस्वी 62 चेंडूंमध्ये 6 चौकारांसह नाबाद 37 धावांवर खेळत आहे. तर पंत 44 बॉलमध्ये 5 फोरसह 33 रन्सवर नॉट आऊट आहे. लंचनंतर या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.