IND vs BAN : पंतनंतर शुबमन गिलचा शतकी तडाखा, बाबर-विराटचा रेकॉर्ड उद्धवस्त

| Updated on: Sep 21, 2024 | 2:24 PM

Shubman Gill Century : शुबमन गिल याला बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. मात्र त्याने दुसऱ्या डावात टीम इंडियाचा डाव सावरला. गिलने शतकी खेळी करत टीम इंडियाला 500 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

IND vs BAN : पंतनंतर शुबमन गिलचा शतकी तडाखा, बाबर-विराटचा रेकॉर्ड उद्धवस्त
Shubman Gill Century
Image Credit source: Bcci
Follow us on

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत याच्यानंतर शुबमन गिल यानेही शतक ठोकलं आहे. शुबमनने ऋषभ पंतसह जोरदार फटकेबाजी केली. गिल आणि पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. पंतने या दरम्यान शतक ठोकलं. मात्र पंतला शतकी खेळीनंतर फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. पंत आऊट झाल्यानंतर केएल राहुल मैदानात आला. गिलने जोरदार फटकेबाजी करत शतक पूर्ण केलं. गिलने 9 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 161 चेंडूत शतक पूर्ण केलं. गिलच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण पाचवं तर 2024 वर्षातील तिसरं शतक ठरलं. गिलचं 2022 नंतरचं हे 12 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. शुबमन यासह 2022 नंतर सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. शुबमनन यासह बाबर आझम, विराट कोहली आणि जो रुट या तिघांना मागे टाकलं.

शुबमन गिल कसोटी पाचवं शतक करणारा आठवा युवा भारतीय ठरला आहे. गिलने याबाबतीत विराट कोहली याला मागे टाकलं आहे. गिलने वयाच्या 25 वर्ष आणि 13 व्या दिवशी हे शतक केलं. तर विराटने वयाच्या 25 वर्ष 43 व्या दिवशी शतक केलं होतं. तर सर्वात कमी वयात 5 कसोटी शतकं करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 19 वर्ष 282 व्या दिवशी हा कारनामा केला होता.

2022 पासून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं

  • शुबमन गिल – 12
  • बाबर आझम – 11
  • जो रुट – 11
  • विराट कोहली – 10
  • ट्रेव्हिस हेड – 9

दुसरा भारतीय फलंदाज

दरम्यान शुबमने या शतकासह आणखी एक कारनामा केला आहे. शुबमन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतकं करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. शुबमनने याबाबतीत विराट कोहली, ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल या तिघांना मागे टाकलं आहे. तर डब्ल्यूटीसीत रोहित शर्मा सर्वाधिक 9 शतकं करणारा पहिला भारतीय आहे.

गिलचा शतकी धमाका

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला 149 धावांवर रोखल्याने भारताला 227 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसरा डाव हा 4 बाद 287 धावांवर घोषित केला. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाकडून शुमबन गिल याने नाबाद 119 धावांची खेळी केली. तर केएल राहुल 22 रन्स करुन नॉट आऊट परतला. तर पंतने 109 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.