SL vs IND: टीम इंडियाची श्रीलंकेवर 43 धावांनी मात, सूर्याच्या नेतृत्वात विजयाने सुरुवात

| Updated on: Jul 28, 2024 | 12:35 AM

Sri Lanka vs India 1st T20i: सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच टी20i सामन्यात टीम इंडियाला विजयी केलं आहे.

SL vs IND: टीम इंडियाची श्रीलंकेवर 43 धावांनी मात, सूर्याच्या नेतृत्वात विजयाने सुरुवात
suryakumar yadav team india
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने टी 20 मालिकेतील पहिला सामना हा 43 धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामी जोडीने शानदार भागीदारी करत टीम इंडियाला घाम फोडला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने मुसंडी मारली त्यामुळे श्रीलंकेला नीट 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने श्रीलंकेला 19.2 ओव्हरमध्ये 170 धावांवर रोखलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे.

पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस या सलामी जोडीने 84 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कुसल मेंडीस 45 धावांवर आऊट झाला. मेंडीसने 27 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्ससह 45 धावा केल्या. त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल परेराने दुसऱ्या विकेटसाठी 56 धावा जोडल्या. पाथुमने 48 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्ससह 79 रन्स जोडल्या. इथून टीम इंडियाने कमबॅक केलं. कुसल परेरा 20 आणि कामिंदु मेंडीस याने 12 धावा जोडल्या. दोघे आऊट झाल्यानंतर श्रीलंकेची 4 बाद 158 अशी स्थिती झाली. त्यानंतर टीम इंडियाने 6 विकेट्स अवघ्या 12 धावांच्या मोबदल्यात घेत श्रीलंकेला 19.2 ओव्हरमध्ये 170 रन्सवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून रियान पराग याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग अक्षर पटेल या दोघांनी 2-2 विकेट्स काढल्या. तर मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट मिळाली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 213 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने सर्वाधिक 58 रन्स केल्या. ऋषभ पंतने 49 धावांचं योगदान दिलं. तर यशस्वी जयस्वाल-शुबमन गिल या दोघांनी अनुक्रमे 40 आणि 34 रन्स केल्या. हार्दिक पंड्याने 9 धावा केल्या. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह ही जोडी अनुक्रमे 10 आणि 1 धाव करुन नाबाद परतले. श्रीलंकेकडून मथीशा पथीराणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर वानिंदु हसरंगा, असिथा फर्नांडो आणि दिलशान मधुशंका या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची विजयी सुरुवात

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चरित असलंका(कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.