बांग्लादेश क्रिकेट संघात फूट! शाकिब अल हसन आणि तस्किन अहमद आमनेसामने, नेमकं खोटं कोण बोलतंय?

| Updated on: Jul 03, 2024 | 4:06 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतून बांगलादेशचं आव्हान सुपर 8 फेरीत संपुष्टात आलं. सुपर 8 फेरीतील तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताविरूद्धच्या सामन्यात बांग्लादेश संघात बरंच काही घडलं. या सामन्यात वेगवान गोलंदाज तस्किन अहमद खेळला नाही. यावरून आता वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत. शाकिब अल हसन आणि तस्किन अहमद यांच्या वक्तव्यात तफावत दिसून येत आहे.

बांग्लादेश क्रिकेट संघात फूट! शाकिब अल हसन आणि तस्किन अहमद आमनेसामने, नेमकं खोटं कोण बोलतंय?
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपली असली तरी बांग्लादेश संघातील वाद काही शमलेला नाही. या स्पर्धेतल्या सुपर 8 फेरीत भारताविरूद्धच्या सामन्यात बांग्लादेश संघात गडबड झाली. प्लेइंग इलेव्हनमध्ये बांग्लादेशचा उपकर्णधार तस्किन अहमद याला जागा मिळाली नाही. कारण तस्किन अहमद हॉटेलमध्येच झोपलेला होता. त्यामुळे त्याला टीम सोबत मैदानात वेळेवर पोहोचता आलं नाही. पण तस्किनने आता यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. “माझी बस सुटली ही खरी बातमी आहे. पण मी वेळेतच स्टेडियममध्ये पोहोचलो होतो. पण मला सामना खेळण्याची संधीच द्यायची नव्हती.”, असं तस्किन अहमनदने सांगितलं आहे. ढाक्यातील वृत्तपत्र अजकेर पुत्रिकेत बोलताना तस्किनने सांगितलं की, “थोडं उशिराने मैदानात पोहोचले. पण टॉसपूर्वीच मैदानात दाखल झालो होतो. टॉरसच्या 30 ते 40 मिनिटं आधीच मैदानात दाखल झालो होतो. बस सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी हॉटेलमधून निघाली. मी तिथे पोहोचण्यासाठी 8 वाजून 43 मिनिटांनी रवाना झालो. मी बस पोहोचण्याच्या वेळेतच मैदानात पोहोचलो. मी उशिराने पोहोचलो म्हणून निवड झाली नाही हे चुकीचं आहे. मी तसा प्लेइंग 11 मध्ये खेळणार नव्हतो.”

दुसरीकडे, तस्किन अहमदच्या बरोबर विरुद्ध विधान दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन याने केलं आहे. शाकिब अल हसनने सांगितलं की, तस्किन उशिरा आल्याने प्लेइंग इलेव्हन निवडताना अडचण आली. शाकिब अल हसनने मीडियाला सांगितलं की, “बस कायम ठरलेल्या वेळ निघते. नियमानुसार बस कोणाचीच वाट पाहात नाही. बसमध्ये पोहोचण्यास कोणाला उशीर झाला तर तो कार किंवा टॅक्सीने येऊ शकतो. तस्किन टॉसच्या 5-10 मिनिटापूर्वी पोहोचला. त्यामुळे त्याचं प्लेइंग 11 मध्ये निवड करणं कठीण झालं.” शाकिबने पुढे असं सांगितलं की, “या प्रकरणी तस्किनने संपूर्ण संघाची माफी मागितली आणि त्याने ही चूक जाणीवपूर्वक केली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण तिथेच संपलं.”

साखळी फेरीत श्रीलंकेचा पत्ता कापत बांगलादेशने सुपर 8 फेरीत स्थान मिळवलं होतं. मात्र या फेरीत बांगलादेशला एकही सामना जिंकता आला नाही. अफगाणिस्तानने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी बांगलादेशला पराभूत केलं. भारताने दुसऱ्या सामन्यात 50 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर अफगाणिस्तानने 8 धावांनी बांगलादेशचा धुव्वा उडवला.