फ्लोरीडातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ होतं. त्यात पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अशा परिस्थितीत येथे सामना होणं कठीण होतं. संपूर्ण मैदान ओलं असल्याने एकही चेंडू टाकणं कठीण होतं. त्यामुळे अमेरिका आयर्लंड सामना रद्द केल्यानंतर भारत कॅनडा सामन्यातही असंच काहीसं झालं. अ गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना आउटफिल्ड ओली असल्याने रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून दिला आणि विषय तिथेच संपला. पण पाकिस्तानची पोटदुखी इथूनच सुरु झाली आणि त्यांनी मैदानातील व्यवस्थानावर टीकास्त्र सोडलं. कारण भारत कॅनडा हा सामना व्हावा यासाठी ग्राउंड्समॅननी खूप प्रयत्न केला. मैदान सुकवण्यासाठी तीन ड्रायर मशिन्सचा वापर करण्यात आला होता. पण असं असूनही शेवटी सामना रद्द करावा लागला. आता पाकिस्तानने मैदान व्यवस्थापनावर आरोप केला आहे.
भारत कॅनडा सामन्यात तीन ड्रायरचा वापर करण्यात आला होता. तर अमेरिका आणि आयर्लंड सामन्यात तीन तासांसाठी पाऊस थांबल्यानंतर फक्त एकाच ड्रायर मशिनचा वापर करण्यात आला. ज्या सामन्यावर पाकिस्तानचं नशिब लागलं होतं. त्या सामन्यासाठी फक्त एकच ड्रायर मशिन्सचा वापर केला गेला, असा आरोप पाकिस्तानी क्रीडाप्रेमी करत आहे. खरं तर दबक्या आवाजात पाकिस्तानला बाहेर करण्यासाठी कट रचल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र याबाबत कोणीही उघडपणे बोलत नाही. 14 जूनला अमेरिका आणि आयर्लंड यांच्या सामना होणार होता.
Three dryers are being used for India's match in Florida today, there was only one used for Pakistan's match yesterday 🇮🇳🔥🔥#tapmad #HojaoADFree #INDvCAN #T20WorldCup pic.twitter.com/GQzyoC7GQ2
— Farid Khan (@_FaridKhan) June 15, 2024
अमेरिका आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने त्याचा थेट फायदा अमेरिकन संघाला झाला. अमेरिकन संघाला थेट सुपर 8 फेरीचं तिकीट मिळालं. तर पाकिस्तानचं जर तरच सर्वच गणित फिस्कटलं. पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्याने सर्वच बाजूने टीका होत आहे. दुसरीकडे, अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं हे कसं विसरून चालेल. पाकिस्तानला विजयासाठी झुंजवलं, इतकंच काय तर सुपर ओव्हरमध्या सामना खेचून आणला. त्यामुळे अमेरिकेची कामगिरी चांगली होती यात काही शंका नाही.