क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे सलग दुसरा सामना वाया गेला आहे. टीम इंडिया विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना हा रद्द करण्यात आला आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. सामना रद्द झाल्याने टीम इंडिया आणि कॅनडा या दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. टीम इंडिया-कॅनडा सामन्याआधी 14 जून रोजी यूएसए विरुद्ध आयर्लंड हा सामनाही ओल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. एकाच मैदानात सलग 2 सामने 24 तासांमध्ये रद्द झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं आणि संतापाचं वातावरण आहे.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामन्याचं आयोजन हे सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा करण्यात आलं होतं. सामन्याला नियोजित वेळेनुसार रात्री 8 तर टॉस 7 वाजून 30 मिनिटांनी होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे पंचांनी 8 आणि त्यानंतर 9 वाजता पाहणी केली. त्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय करण्यात आला. टीम इंडिया आणि कॅनडाचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना होता, जो पावसाने वाया घालवला.
सामना रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर कॅनडाच्या खेळाडूंनी भारतीय दिग्गजांसह फोटो काढले. कॅनडाच्या युवा खेळाडूंनी विराट कोहलीसोबत फोटो काढले. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना ऑटोग्राफ दिली.
टीम इंडिया-कॅनडा सामन्यात पावसाचा विजय
🚨 UPDATE 🚨
The #CANvIND match has been called off due to wet outfield.
Both the teams share a point each.#T20WorldCup | #TeamIndia
📸 ICC pic.twitter.com/6KiRpe9Y2D
— BCCI (@BCCI) June 15, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
कॅनडा क्रिकेट टीम: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉनसन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डाइलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटन, प्रगत सिंह, रविंद्रपाल सिंह आणि रेयानखान पठान.