T20 World Cup 2024: टीम इंडियाचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा! बांगलादेश-अफगाणिस्तान विरुद्धचे आकडे काय सांगतात?

| Updated on: Jun 17, 2024 | 7:48 PM

Team India Super 8 T20 World Cup 2024: टीम इंडियाला सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा सामना करायचा आहे.

T20 World Cup 2024: टीम इंडियाचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा! बांगलादेश-अफगाणिस्तान विरुद्धचे आकडे काय सांगतात?
team india rohit sharma t20 world cup 2024
Image Credit source: BCCI
Follow us on

बांगलादेशने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात 17 जून रोजी नेपाळवर मात करत सुपर 8 चं तिकीट मिळवलं. बांगलादेश सुपर 8 मध्ये पोहचताच 8 संघ निश्चित झाले. आता या 8 संघांमध्ये सेमी फायनलसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. सुपर 8 साठी एकूण 2 ग्रुप आहेत. बी ग्रुपमध्ये यूएसए, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आहेत. तर ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. प्रत्येक संघ सुपर 8 मध्ये आपल्या ग्रुपमधील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. या 4 पैकी 2 संघ हे सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध सामना होणार असल्याने टीम इंडियाचा सेमी फायनलचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र पुढे काय होईल, याबद्दल भाकीत करणं हे धाडसाचं ठरेल.

टीम इंडियासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्धचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत निश्चितच सोपा असणार आहे. टीम इंडियाचे पहिले 2 सामने हे काही अंशी सोपे असणार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या तगडया संघांचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध वरचढ राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियाची या दोन्ही आशियाई संघांविरुद्धची आकडेवारी जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 8 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडियाने 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही. अर्थात टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध अजिंक्य आहे. त्यामुळे टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्धही विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. तसेच टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 13 सामने झालेत. टीम इंडियाने 13 पैकी 12 सामने जिंकलेत. तर बांगलादेशने 2019 साली एकमेव विजय मिळवला होता. त्यामुळे अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्धची आकडेवारी पाहता टीम इंडियाचा सेमी फायनलचा रस्ता क्लिअर आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.