टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराटच्या खराब कामगिरीनंतर सुनील गावस्कर यांची स्तुतीसुमनं! म्हणाले…

| Updated on: Jun 13, 2024 | 4:59 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. सलग तीन सामने जिंकत भारताने सुपर 8 फेरी गाठली आहे. असं असूनही भारताला काही खेळाडूंच्या फॉर्मबाबत चिंता सतावत आहे. यात स्टार फलंदाज विराट कोहली याचंही नाव आहे. असं असूनही सुनील गावस्कर यांनी त्याची पाठराखण केली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराटच्या खराब कामगिरीनंतर सुनील गावस्कर यांची स्तुतीसुमनं! म्हणाले...
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा टप्पा टीम इंडियाने ओलांडला आहे. आता सुपर 8 फेरीकडे टीम इंडियाचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे, न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियममध्ये टीम इंडियाला धावा करताना अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहलीचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरला आहे.मागच्या महिन्यात आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या विराट कोहलीला नक्की झालंय तरी काय? अमेरिकेत त्याने सराव सामन्यात भाग घेतला नव्हता, तसेच उशिराने टीमसोबत जोडला गेला होता. पण साखळी फेरीतील पहिल्या सामन्यापासून विराट कोहली कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला येत आहे. मात्र त्याचा तसा काहीच फायदा झालेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात एकेरी धावा केल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध 1, पाकिस्तानविरुद्ध 4 आणि अमेरिकेविरुद्ध खातंही खोलता आलं नाही. त्याची ही कामगिरी पाहून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे त्याने ओपनिंगला यावं की नाही यापासून चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मात्र विराट कोहलीची पाठराखण केली आहे.

“सुरुवातीच्या तीन सामन्यात अपयश आलं तरी त्यावरून परीक्षण करता येणार नाही. आपण या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. आता पुढे सुपर 8 फेरीचे सामने होतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि आशा आहे की, फायनलही खेळू. त्यामुळे त्याने संयम बाळगावा आणि स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जावं. त्याला याबाबत स्वत:ला माहिती आहे.” असं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले. “तीन वेळा कमी धावांवर तंबूत परतावं लागलं. अनेकदा तुम्हाला चांगला चेंडूचा सामना करावा लागतो. दुसरा कोणता दिवस असता तर तो चेंडू वाइड किंवा चौकार गेला असता. पण ते त्या दिवशी झालं नाही. आम्हाली त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा. तो नक्कीच चांगलं करेल.” असंही गावस्कर पुढे म्हणाले.

दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने विराट कोहली पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं अशी भूमिका मांडली आहे. “मला असं वाटतं की विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. सिमिंग कंडिशनमध्ये बॅटिंग करणं वाटतं तितकं सोपं नाही. ही काय आयपीएलची पाटा विकेट नाही. तिथे भले तो आक्रमकपणे खेळत होता. पण इथे तसं काही करणं महागात पडेल. त्यामुळे त्याने विकेट वाचवून खेळलं तर बरं होईल.”, असं मोहम्मद कैफ म्हणाला. टीम इंडियाचा शेवटचा सामना कॅनडासोबत 15 जूनला प्लोरिडामध्ये आहे.