टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, हा दिवस असेल शेवटचा

| Updated on: Mar 09, 2024 | 5:52 PM

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. आयसीसी स्पर्धांमध्ये शेवटच्या क्षणी पराभवाचं गणित सोडलं तर इतर सर्व ठिकणी रोहित कर्णधारपदाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. टी20 वर्ल्डकप 2022 ची उपांत्य फेरी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, हा दिवस असेल शेवटचा
रोहित शर्माने आपल्या निवृत्तीबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं, या दिवशी क्रिकेटला ठोकणार रामराम
Follow us on

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये ग्लॅमर, तडका आणि भरपूर पैसा आहे. पण या दोन्ही बाबींमध्ये एक गोष्ट कायम आडवी येते ती म्हणजे वय..बॉलिवूडमध्ये वयाचं तसं काही बंधन येत नाही. पण क्रिकेटमध्ये 35 शी ओलांडली की निवृत्तीचे वेध लागतात. फॉर्मात असाल तर तशी चर्चा होत नाही. पण एकदा का खेळाडूने फॉर्म गमावला तर निवृत्तीसाठी वारंवार विचारणा होते. असंच काहीस रोहित शर्माच्या बाबतीतही घडत आहे. रोहित शर्मा 30 एप्रिल 2024 साली 37 वर्षांचा होत आहे. या वयातही रोहित शर्माचा फॉर्म कायम आहे. त्यामुळेच त्याच्याकडे टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. असं असलं तरी कर्णधार रोहित शर्मालाही निवृत्तीबाबत विचारलं जात आहे. आता खुद्द रोहित शर्मा याने आपल्या निवृत्तीबाबत सांगितलं आहे. रोहित शर्माने जिओ सिनेमावर बोलताना आपल्या मनातलं सांगून टाकलं.

‘एक दिवस मी जागा होईल आणि मला जाणवेल की मी आता पहिल्यापेक्षा बरा नाही. तेव्हा मी क्रिकेटपासून सरळ दूर होईन आणि निवृत्ती जाहीर करेन. पण मागच्या 2-3 वर्षात मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे.’ असं रोहित शर्माने सांगितलं. याचाच अर्थ असा निघतो की रोहित शर्माचं निवृत्ती घेण्याचं सध्यातरी मन नाही. त्यामुळे आता रोहितच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया टी20 वर्ल्डकप जिंकेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी असंच काहीसं निवृत्तीबाबतचं भाकीत मोहम्मद शमीने सांगितलं होतं.

इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आता वेध लागले आहेत ते आयपीएलचे..आयपीएलमध्ये रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्याच्याकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. दुसरीकडे, पाचव्या कसोटी तिसऱ्या दिवशी पाठदुखीच्या त्रासामुळे रोहित शर्मा मैदानात उतरला नव्हता. त्यामुळे आयपीएलला तर मुकणार नाही ना? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना सतावत आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप काही कळू शकलेलं नाही.