Video : सरफराज खानने चेंडूला हात न लावता घेतली विकेट, रोहितला वारंवार सांगितलं आणि…

| Updated on: Oct 24, 2024 | 3:27 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विल यंगची विकेट आर अश्विनच्या खात्यात गेली. पण या विकेटचं संपूर्ण श्रेय हे सरफराज खानच्या खात्यात जातं. त्याने कर्णधार रोहित शर्माला 24व्या षटकात खूप समजवलं आणि कुठे विकेट हाती लागली. काय झालं नेमकं तुम्हीच पाहा

Video : सरफराज खानने चेंडूला हात न लावता घेतली विकेट, रोहितला वारंवार सांगितलं आणि...
Image Credit source: video grab
Follow us on

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने डावाची सुरुवात सावधपणे केली. 32 धावा असताना आर अश्विनने पहिली विकेट मिळवून दिली. टॉम लॅथमला 15 धावांवर असताना तंबूत पाठवलं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि विल यंग या जोडीने डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये 44 धावांची भागीदारी झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढत होतं. विकेटसाठी मेहनत घेऊनही हाती काही लागत नव्हतं. दुसऱ्या विकेटसाठी सरफराज खानचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं. त्याने चेंडूला हात न लावता टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. न्यूझीलंडच्या डावातील 24 व्या षटकात हा प्रकार घडला. आर अश्विनने या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला पण लाईन आणि लेंथ थोडी भरकटलेली दिसली. विकेटकीपर ऋषभ पंतने कोणतीही चूक न करता चेंडू पकडला.

आर अश्विनने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग साईटवून जात होता. या चेंडूवर विल यंगने फ्लिप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सुटला. यानंतर भारतीय खेळाडूंना जोरदार अपील केली. मात्र पंचांनी त्याला नाबाद असल्याचं घोषित केलं. यानंतर खरी भूमिका बजावली ती सरफराज खानने..सरफराज खानने रोहित शर्माला विकेटसाठी डीआरएस घेण्यास सांगितलं. त्याला ही विकेट असल्याचा पूर्ण विश्वास होता. सरफराज वारंवार रोहितला चेंडूला बॅटला स्पर्श करून गेल्याचं सांगत होता. सरफराजला विराट कोहलीची साथ मिळाली आणि रोहित शर्माने अखेर डीआरएस घेतला. मग काय सरफराजने सांगितलं तेच झालं आणि विल यंगला बाद होत तंबूत जावं लागलं.

भारतीय संघात सरफराज खान सध्या चांगला फॉर्मात असल्याचं दिसत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 150 धावा केल्या होता. त्यामुळेच त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं आहे. आता कर्णधार रोहित शर्माला समजावून डीआरएस घेण्यास भाग पाडलं आणि विकेट मिळवून दिली.