T20 World Cup 2024: टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्माची मोठी घोषणा, ट्विट करत म्हणाला…

| Updated on: Jul 03, 2024 | 6:14 PM

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष साऱ्या देशात सुरु आहे. अशात कॅप्टन रोहित शर्माने ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.

T20 World Cup 2024: टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्माची मोठी घोषणा, ट्विट करत म्हणाला...
rohit sharma world cup 2024 trophy
Follow us on

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 29 जून रोजी पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप उंचावला. टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीनंतर 17 वर्षांनी रोहितच्या कॅप्टन्सीत टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. नैसर्गिक परिस्थितीमुळे टीम इंडियाला काही दिवस बारबाडोस येथे थांबावं लागलं. मात्र त्यानंतर आता टीम इंडिया भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ नवी दिल्लीत गुरुवारी 4 जुलै रोजी पोहचणार आहेत. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने ट्विट करत मोठी माहिती क्रिकेट चाहत्यांसह शेअर केली आहे.

रोहित शर्माने वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना आमंत्रित केलंय. टीम इंडिया बुधवारी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने येणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप ट्रॉफीसह टीम इंडियाच्या खेळाडूंची ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी रोहितने साऱ्या क्रिकट चाहत्यांना ट्विट करत बोलावलं आहे.

रोहित शर्माचं ट्विट

“तुमच्यासह या खास क्षणाचा आनंद साजरा करु इच्छित आहे. चला, तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणुकीसह वर्ल्ड विजयाचा आनंद साजरा करूयात. घरी येत आहे”, असं रोहितने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय.

टीम इंडियाच्या खेळाडूंची 2007 टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा बेस्टच्या डबल डेकर ओपन डेक बसमधून टीम इंडियाच्या खेळाडूंची मिरवणूक काढलेली. तेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेट चाहत्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली होती. त्या संघात रोहित शर्मा तेव्हा एक खेळाडू म्हणून सहभागी होता. मात्र यंदा रोहित कॅप्टन आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या मुंबईकर खेळाडूसाठी आणि संपूर्ण टीम इंडियासाठी सारे भारतीय क्रिकेट चाहते पुन्हा एकदा गर्दी करतील, यात काडीमात्र शंका नाही.