चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की…

| Updated on: Sep 09, 2024 | 9:23 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. आयसीसी स्पर्धेचं आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्वोतोपरी तयारी केली आहे. स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रकापासून नियोजनापर्यंत खलबतं सुरु आहेत. फक्त भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही यावर घोडं अडून बसलं आहे. बीसीसीआयने भारतीय पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. भारत सरकाराने परवानगी दिली तरच टीम इंडिया पाकिस्तानात येईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं विधान महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या विधानाचा सरळ अर्थ भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असाच निघत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध केला. तसेच भारत पाकिस्तान संबंधांबाबत स्पष्टपणे सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘जोपर्यंत तिथला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्याआधी आम्हाला जम्मू काश्मीरमधील तरूणांच मत जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे.’ अमित शाह यांचं हे विधान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही लागू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यापूर्वीच बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड स्वरुपात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे. मात्र आयसीसीकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय आलेला नाही.

दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली आहे. 1 डिसेंबरपासून ते कार्यभार सांभाळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. तसेच अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं.