दुलीप ट्रॉफी स्पर्धेनंतर इराणी ट्रॉफी स्पर्धेसाठी संघ सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत रणजी ट्रॉफीसाठी तयारी सुरु झाली आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉपी 2024-2025 स्पर्धेसाठी संभाव्य संघ जाहीर केला आहे. या संभाव्य संघात विराट कोहलीचं नाव असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2018 नंतर पहिल्यांदाच विराट कोहलीचं नाव रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीच्या संभाव्य संघात देण्यात आलं आहे. त्यावेळी संघात इशांत शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, गौतम गंभीर आणि नवदीप सैनी या टीम इंडियाच्या खेळाडूंची नावं होती. सहा वर्षानंतर विराट कोहलीचं नाव दिल्ली संघाच्या संभाव्य यादीत आले आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि नवदीप सैनीसह 84 खेळाडूंचा या संभाव्य संघात सहभाग आहे. पण मागच्या पर्वात दिल्लीकडून खेळलेल्या अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला संघातून वगळण्यात आलं आहे.
दुसरीकडे, बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी संपल्यानंतर विराट कोहली मोकळा होणार आहे. कारण त्याने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. असं असताना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपू्र्वी रणजी सामने खेळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराट कोहली शेवटचा रणजी सामना 11 वर्षांपूर्वी खेळला होता. 2012-13 च्या रणजी पर्वात विराट कोहलीने दिल्लीकडून खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध दोन डावात एकूण 57 धावा केल्या होत्या. तेव्हा दिल्ली संघाची धुरा वीरेंद्र सेहवागच्या खांद्यावर होती.